बारामतीत ढगफुटी; शेतकऱ्यांना दिलासा
By Admin | Updated: July 2, 2014 01:59 IST2014-07-02T01:59:54+5:302014-07-02T01:59:54+5:30
ढगफुटी एरवी धास्ती घेऊन येते. मात्र, बारामतीच्या दुष्काळी भागातील अनेक गावांना सोमवारी झालेल्या ढगफुटीने जीवन दिले.

बारामतीत ढगफुटी; शेतकऱ्यांना दिलासा
बारामती/ उंडवडी : ढगफुटी एरवी धास्ती घेऊन येते. मात्र, बारामतीच्या दुष्काळी भागातील अनेक गावांना सोमवारी झालेल्या ढगफुटीने जीवन दिले. पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली पायपीट अवघ्या दीड तासाच्या पावसाने संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बारामती-दौंड रस्त्यावरील या गावांना पाण्याचा दुसरा स्त्रोत्र उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या पाचवीलाच दुष्काळ पुजला असल्यासारखे आहे. मागील वर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असताना बारामती तालुक्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे वर्षभर पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची टंचाईचा सामना या भागातील नागरिकांना, शेतकऱ्यांना करावा लागला. पावसाळा सुरू होऊन एक महिना लोटला तरी पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर केलेल्या खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या होत्या. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हैराण झाले होेते. दुबार पेरण्यांसाठी पावसाची आवश्यकता होती. याच पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी ४ ते ६ या दोन तासांत पावसाने होत्याचे नव्हते केले.
चार वाजेपर्यंत कोरडे पडलेले तलाव, चाऱ्या, बंधारे, नाले दुथडी भरून वाहू लागले. पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात होता. या भागात कृषी आणि महसूल विभागाच्या वतीने ओढ्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करण्यात आले आहे. जलसंंधारणाच्या या कामासाठी लोकसहभाग मिळाला. त्यामुळे पावसाचे पडलेले पाणी अडविण्यात यश आले. जलसंधारणाच्या कामामुळे सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी अडविण्यात यश आले.
आगामी दोन महिन्यांत या अडविलेल्या पावसाच्या पाण्याचा शेतकऱ्यांना वापर करता येणार आहे. बारामती तालुक्यात दुष्काळी पट्ट्यात कऱ्हा नदी खोलीकरणासाठी जवळपास सर्वच ठिकाणी ओढ्यांचे खोलीकरण, रुंदीकरण केले आहे. जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडली. (वार्ताहर)