पुणे : तुळशी माळ गळा काशे पितांबर या अभंगाप्रमाणे वारकरी आषाढी वारीनिमित्त लाखो भक्तांची पावले दरवर्षी पंढरपूरकडे वळतात. वारकऱ्यांच्या गळ्यात असलेली तुळशीची माळ पिढ्यानपिढ्या तयार करणारे पंढरपूरचे राजू जनार्दन गोणेकर. तुळशी माळ व्यापारासाठी नाही तर तुळशी माळेच्या पवित्र सेवेसाठी साकारत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.गोणेकर कुटुंब मागील अनेक पिढ्यांपासून विठोबाच्या सेवेसाठी तुळशीच्या माळा तयार करण्याचे पारंपरिक कार्य करत आले आहे. हे काम त्यांनी केवळ व्यवसाय म्हणून कधीही केले नाही, तर ते सेवा, भक्ती आणि परंपरेचे प्रतीक मानले आहे.
आजच्या भांडवली युगातही या कुटुंबाने ना नफा, ना तोटा या तत्त्वावर कार्य करत श्रद्धेचा आदर्श उभा केला आहे. राजू गोणेकर सांगतात, ‘तुळशी ही पवित्र वनस्पती आहे. तिच्या प्रत्येक माळेवर विठोबाचं नाव घेतलं जातं, आणि ती माळ जर आमच्या हातून बनली, तर ती विठोबाचीच कृपा आहे.
आषाढी एकादशी, कार्तिकी, चातुर्मासात मागणी वाढते :
विशेषतः आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या काळात विठ्ठलभक्तांकडून माळांची मागणी मोठ्या प्रमाणात येते. पण गोणेकर कधीही किंमत वाढवत नाहीत. जे काही थोडंफार स्वखर्च वसूल होतो, तोच स्वीकारतात.
श्रद्धेचा वारसा – आधुनिक काळातही टिकवलेली भक्ती :आजच्या स्पर्धात्मक युगात जिथे प्रत्येक गोष्ट कमाईचा साधन मानली जाते, तिथे गोणेकर कुटुंबाने सेवेचा वारसा जपलेला आहे. त्यांची ही भक्ती, एकनिष्ठा आणि नि:स्वार्थ भावना विठोबाच्या सेवेला अर्पणच आहे.