पुणे : पालख्यांबरोबर पुण्यात मुक्कामी आलेल्या वारकऱ्यांना शनिवारी दुपारी शाळेतील मुलांनी वळलेले गुळपोळीचे लाडू मिळतील. शनिवारी दिवसभर शाळेतील मुले उत्साहाने हे लाडू वळण्याचे काम करत होती. आमदार हेमंत रासने यांनी मुलांचे कौतुक केले.शनिवार पेठेतील एनईएमएस शाळेतील विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. वारकऱ्यांसाठी शहरात बहुतेक ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली जाते. त्यांच्यासाठी चहा-नाष्टाही मंडळांकडून दिला जातो. हे पाहून एनईएमएस शाळेतील विद्यार्थ्यांनी आपणही वारकऱ्यांसाठी काही करावे, असे वाटू लागले. काही शिक्षकांच्या सहकार्याने गुळाचे लाडू करण्याचे निश्चित झाले. त्यासाठीची प्राथमिक तयारी करून झाल्यावर शनिवारी दुपारी मुलांनीच हे लाडू वळले.आमदार रासने यांनी मुलांमध्ये बसून त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. पर्यावरण संवर्धन म्हणून वारकऱ्यांना हे लाडू प्लास्टिकच्या नाही तर कागदी पिशवीतून देणार आहोत, असे मुलांनी रासने यांना सांगितले. पर्यावरण संवर्धनाची आपली मोहीम मुलांपर्यंत पोहचली आहे हे पाहून आमदार रासने यांनीही आनंद व्यक्त केला.
Ashadhi Wari 2025 : वारकऱ्यांसाठी मुलांनी वळले गुळपोळीचे लाडू
By राजू इनामदार | Updated: June 20, 2025 21:15 IST