नारायणगाव (पुणे) : प्रत्येक चौकात २५ हजार रूपयांची दंड वसुली आणि २० वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, असं 'टारगेट' महिला पोलीस भगिनींना देण्यात आलेले दिसले, टार्गेट देऊन वसुली केली जात असेल तर खेदानं म्हणावे लागेल “ ट्रिपल इंजिन सरकार म्हटलं जातं, त्याची ट्रिपल वसूली चालू आहे ” अशी उपरोधिक टीका खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकमतशी संवाद साधताना केली आहे.
मुंबईत प्रवास करीत असताना सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडविली. त्यांनी ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेतली. यावेळी त्या भगिनीने थेट तिच्या मोबाईलवरील मेसेजच दाखवला मेसेजमध्ये “प्रत्येक चौकात २५ हजार रुपयांची वसुली आणि २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असं 'टारगेट' या भगिनींना देण्यात आलेले दिसले. उन्हाळा असो वा पावसाळा, थंडी या सर्व ऋतूमध्ये तसेच दिवसभर प्रदूषणात वाहतूक नियमांनाच कर्तव्य करणाऱ्या वाहतूक पोलिसांना 'टारगेट' का? असा सवाल करून त्यांनी वसुलीचा आकडा सादर करून 'टारगेट'चे रहस्य मांडले.
आता आपण एक छोटे गणित करुयात...
मुंबईत ६५२ ट्रॅफिक जंक्शन आहेत. २५०००×६५२ = १,६३००००० रुपये प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल १ कोटी ६३ लाख रुपयांची वसूली केली जाते. यामध्ये इतर शहरांच्या वसूलीचा आकडा धरलेलाच नाही बरं का? हे नेमकं काय आणि कशासाठी सुरु आहे? अशा पद्धतीने टारगेट देऊन सर्वसामान्य जनतेची लूट का केली जातेय याबाबत संबंधित मंत्री महोदय किंवा अधिकाऱ्यांनी खुलासा केलाच पाहिजे. वाहतूक शाखा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीचा अड्डा बनलीय का? याची जनतेला माहिती मिळायलाच हवी, असे प्रतिपादन ही खा. कोल्हे यांनी केला.