आदित्यदादा, राजगडावर रोप-वे नको ना बांधू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST2021-06-22T04:09:00+5:302021-06-22T04:09:00+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांसारख्या विविध नेत्यांना पत्र लिहून चिमुकली मंडळी आपल्या भावना त्यांच्याकडे व्यक्त करताना ...

आदित्यदादा, राजगडावर रोप-वे नको ना बांधू
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांसारख्या विविध नेत्यांना पत्र लिहून चिमुकली मंडळी आपल्या भावना त्यांच्याकडे व्यक्त करताना आपण पाहिले आहे. पण यावेळी पुण्यातील एका चिमुकलीने थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनाच पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे पर्यावरण मंत्र्यांकडे तिने आपली कैफियत मांडली आहे. हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वेल्हा तालुक्यातील राजगडावर रोप-वे तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, या निर्णयानंतर काही शिवप्रेमी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तर काहींनी या निर्णयाचे स्वागत केले.पण पुण्यातील साईशा अभिजित धुमाळ नावाच्या एका चिमुकल्या तरुणीने राजगडावरील रोप-वेला विरोध दर्शविला आहे. आणि रोप- वेला विरोध दर्शविताना तिने आपली विरोधामागची भूमिका देखील मंत्री आदित्य ठाकरेंकडे स्पष्टपणे व्यक्त केली आहे.
आदित्य ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात साईशा म्हणते, माननीय आदित्यदादा यांना पत्रास कारण की, राजगडावर रोप-वे बांधू नका. कारण गडावर आणि आजूबाजूला फुलपाखरू, हरण, मोर, ससे यांची घरं असतात. आपण गर्दी केली तर हे सगळे तिथून निघून जातील. त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर काढू नका Please. मला ट्रेकिंगला गेल्यावर त्यांना लपून पाहायला, फुलपाखरांच्या मागे धावायला आवडतं. आपण त्यांना आपल्या घरी राहू देत नाही. मग त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर पाठवतो.