बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:53 IST2018-10-04T00:53:30+5:302018-10-04T00:53:45+5:30
खेड उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
राजगुरुनगर : राजगुरुनगरला विनापरवाना वाहन चालविणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बुधवारी धडक कारवाई केली. येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर जवळपास ५६ जणांवर कारवाई करत १६ हजार ४०० रूपये दंड वसूल करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले.
खेड उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाºया प्रवासी गाडीचालकाला १,००० रुपये दंड, तर अल्पवयीन मुलांच्या ताब्यात दुचाकी दिल्याबद्दल ९ पालकांवर न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ, संतोष लांडे, विक्रम गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक संदीप येळे व नीलेश बडाख हे अधिकारी सहभागी झाले होते. वाहतूक पोलीस हवालदार सर्जेराव बागल यांच्यासह होमगार्ड व महिला पोलीस कर्मचारीदेखील सहभागी झाले होते. विनाहेल्मेट वाहन चालविणे, ट्रिपलसीट वाहन चालविणे, विनाकागदपत्र वाहन चालविणे, वाहन चालवताना मोबाईल वापरणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, लेन कटिंग करणे व फॅन्सी नंबरप्लेट वापरणे आदी कारणास्तव प्रत्येकी ५०० ते २०० रुपये दंड आकारण्यात आला. यापुढे विनापरवाना वाहन चालविणार नाही, अशी शपथ विद्यार्थी व पालकांना देण्यात आली. विद्यार्थी व पालकांच्या गर्दीने पोलीस ठाण्याचे आवार फुलून गेले होते. त्यामुळे बघ्यांची गर्दी वाढली होती.
वरिष्ठांच्या आदेशानुसार शहरात सर्वत्र नाकाबंदी केली जाईल. अल्पवयीन मुलांच्या ताब्यात दुचाकी देऊ नये. रोडरोमिओ व गावगुंडांना या कारवाईने धडकी भरली आहे. यापुढेही कारवाईचे सत्र नियमितपणे सुरू राहील. सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.
- संदीप येळे,
सहायक पोलीस निरीक्षक, खेड पोलीस ठाणे