पोषण आहारातून ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा

By Admin | Updated: June 24, 2015 05:13 IST2015-06-24T05:13:45+5:302015-06-24T05:13:45+5:30

या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे़ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सायंकाळी जुन्नरला भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली़

31 students get poisoning from nutrition | पोषण आहारातून ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा

पोषण आहारातून ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा

जुन्नर / आपटाळे : बल्लाळवाडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय पोषण आहार व त्याचबरोबर प्रसाद म्हणून दिलेल्या शिऱ्यातून ३१ मुलांना विषबाधा झाली़ या १६ मुले व १५ मुलींवर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ मुलांबरोबरच २ शिक्षिका आणि एका पालकावरही उपचार करण्यात येत आहे़ त्यात एका मुलाची प्रकृती गंभीर आहे़
या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे़ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सायंकाळी जुन्नरला भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली़
पोषण आहारातून विषबाधा प्रकरणी मुख्याध्यापकांसह तिघांविरुद्ध ओतूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ मुख्याध्यापक शिवाजी दामोदर डुंबरे, ज्येष्ठ शिक्षक भगवान सखाराम रेंगडे आणि आहार पुरविणाऱ्या सुरेखा चंद्रकांत डोंगरे अशी त्यांची नावे आहेत़
याप्रकरणी विस्तार अधिकारी सुनंदा डुंबरे यांनी फिर्याद दिली आहे़ त्यानुसार शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८, किरकोळ व गंभीर स्वरुपाची विषबाधा झाल्याबद्दल कलम ३३७ व ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
बल्लाळवाडी येथील या शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग भरतात़ गेल्या आठवड्यात शाळा सुरू झाल्यानंतर, नियमितपणे मुलांना पोषण आहार दिला जातो़ त्याप्रमाणे सर्वांना पोषण आहार दि. २२ जून रोजी दुपारी देण्यात आला़ त्याच बरोबर आहार बनविणाऱ्या सुरेखा डोंगरे यांनी त्यांच्या घरी २१ जून रोजी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचा प्रसाद म्हणून शिरा या विद्यार्थी व विद्यार्थिनींना दिला़ त्यानंतर सर्व मुले घरी गेली़
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज सकाळी नेहमी प्रमाणे भरली; परंतु विद्यार्थी संख्या अचानक मोठ्या प्रमाणावर कमी असल्याचे शाळेतील वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांच्या लक्षात आले़ कारण, पटसंख्या ८७ आहे. मुले एवढी कमी कशी आली, याची त्यांनी घरी जाऊन पालकांना विचारणा केली असता, अनेक मुलांना २२ जून रोजी रात्रीपासून उलटी, जुलाब, चक्कर असा प्रकार होत असल्याचे लक्षात आले़ ८७ पैकी ७० मुलांनी खाऊ खाल्ल्यानंतर त्यांना त्रास झाला़ हे लक्षात येताच, पालकांची व शिक्षकांची पळापळ सुरू झाली़ उपसरपंच संजय नायकोडी यांनी तत्काळ रुग्णवाहिका मागवली व विद्यार्थ्यांना जुन्नर येथील छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर डॉ. शिंगोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ उपचार सुरू केले़ त्यामुळे सध्या विषबाधित असलेले विद्यार्थी धोकादायक परिस्थितीच्या बाहेर असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. श्याम बनकर यांनी सांगितले.
उपचारासाठी दाखल असलेल्या मुल-मुली ही साधारण पाच ते नऊ वर्षं वयोगटांतील असून, त्यांची नावे पुढीलप्रमाणे : वैशाली नायकोडी, रोहन नायकोडी, सिद्धी डोंगरे,विनायक गावडे, आदित्य बोऱ्हाडे, संस्कार डोंगरे, सानिका साळवे, तन्मय गावडे, श्रेया नायकोडी, शुती परिहार, परिमल ससाणे, ज्ञानदा नायकोडी, आविष्कार डोंगरे, राखी आहेर, सूरज नवले, पीयूष डोंगरे, दीपक गाडेकर, यश डोंगरे, रोशनी गावडे, सानिका शिंदे, राहुल शिंदे, धनंजय नायकोडी, श्रावनी कुटे, ज्ञानेश्वरी नायकोडी, साहील नवले, विवेक गावडे, सानिका नायकोडी, आरिया आहेर, सुशीला मुंढे, कृष्णा डोंगरे, सुमीत रोकडे व शिक्षिका
लता हांडे, माधुरी पडवळ, पालक शशिकला ससाणे या सर्वांवर जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपचारासाठी डॉ. सुनील शेवाळे, डॉ़ सागर शिंदे, डॉ़ कमलाकर, डॉ. शिंगोटे यांनी उपचार केले.
दरम्यान, शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके म्हणाल्या की, घडलेला प्रकार अतिशय चटका लावणारा असून, विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याचा तपास झाल्यावर दोषींची गय केली जाणार नाही, अशी माहिती आशाताई बुचके यांनी दिली.

Web Title: 31 students get poisoning from nutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.