चंद्रकांत पाटील कोल्हापूरातून पळून गेले, त्यांना एवढी मस्ती कुठून आली; हसन मुश्रीफांचा खोचक वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 17:11 IST2021-04-05T04:22:37+5:302021-04-05T17:11:25+5:30

Hasan Mushrif Talk on Chandrakant Patil Comment on BJP IT cell incharge: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आजारपणावर भाजपचे मीडिया सेलचे प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांनी भाष्य करीत आजारपणाला वाझे प्रकरणाशी जोडले होते. त्याबाबत जिंदाल यांनी माफी मागावी, अशी आपण मागणी केली होती, असे मुश्रीफ म्हणाले.

Chandrakant patil ran away from Kolhapur, should not talk on Uddhav Thackeray: Hasan Mushrif | चंद्रकांत पाटील कोल्हापूरातून पळून गेले, त्यांना एवढी मस्ती कुठून आली; हसन मुश्रीफांचा खोचक वार

चंद्रकांत पाटील कोल्हापूरातून पळून गेले, त्यांना एवढी मस्ती कुठून आली; हसन मुश्रीफांचा खोचक वार

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापुरातील एकाही विधानसभा मतदारसंघातून निवडून येणार नाही, म्हणूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil ) हे पुण्याला पळून गेले. तेथील एका महिला आमदाराची जागा हिरावून घेतली. अशा व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सारख्या प्रामाणिक व्यक्तीवर बोलू नये, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केली. कोरोनामुळे ५५ हजार बालके बाधित झाली, अशा परिस्थितीत भाजपच्या मंडळींनी राजकारण थांबवावे, असेही त्यांनी म्हटले. (Hasan Mushrif Slams Chandrakant patil on Politics over Sharad Pawar operation.)

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आजारपणावर भाजपचे मीडिया सेलचे प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांनी भाष्य करीत आजारपणाला वाझे प्रकरणाशी जोडले होते. त्याबाबत जिंदाल यांनी माफी मागावी, अशी आपण मागणी केली होती. माफी राहिली बाजूलाच चंद्रकांत पाटील हे जिंदाल काय चुकीचे बोलले असे समर्थन करीत आहेत. त्यांना इतकी मस्ती कोठून आली? ते अतिशय भित्रे आहेत, कोल्हापुरातील एकाही विधानसभेच्या जागेवर उभारण्याची त्यांची ताकद नसल्यानेच ते पुण्याला पळून गेले. अशांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सारख्या प्रामाणिक व्यक्तीवर बोलणे योग्य नाही. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. राज्यात ५५ हजार बालके बाधित झाली आहेत. राजकारण किती करायचं? याला काही मर्यादा आहे की नाही.

महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालणार

मंत्री मुश्रीफ म्हणाले, देवेंद्र फडणवीस की चंद्रकांत पाटील असोत, राज्य सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. सरकार अस्थिर करण्याचा कितीही प्रयत्न करू देत, कसलेही व काहीही आरोप करू देत, महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालणार आहे. महाविकास आघाडी सरकारवरील आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.

चंद्रकांत पाटील तुम्हाला अनुभव काय, तुम्ही काय दिवे लावले -संजय पवार

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये क्रमांक दोनचे मंत्री असताना तुमच्याकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम आदी खाती होती. त्यावेळी तुम्हाला या कामाचा काय अनुभव होता. कोल्हापूरचा कायापालट करताना तुम्ही काय दिवे लावले. ठाकरे घराण्यावर टीका शिवसेना खपवून घेणार नाही. जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला संजय पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

Web Title: Chandrakant patil ran away from Kolhapur, should not talk on Uddhav Thackeray: Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.