निवारा केंद्रात चोरांचा आसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2016 00:59 IST2016-03-05T00:59:07+5:302016-03-05T00:59:07+5:30
पिंपरीतील वैष्णोदवी मंदिरात चोरी करणाऱ्या नेपाळी चोरट्यांना पोलिसांनी मंडईजवळील रात्र निवारा केंद्रातून अटक केली

निवारा केंद्रात चोरांचा आसरा
पिंपरी : पिंपरीतील वैष्णोदवी मंदिरात चोरी करणाऱ्या नेपाळी चोरट्यांना पोलिसांनी मंडईजवळील रात्र निवारा केंद्रातून अटक केली. हेच चोरटे गेल्या १५ ते २० दिवसांपासून पिंपरी मंडईजवळील रात्र निवारा केंद्रात राहत असल्याचे समोर आले आहे. तात्पुरत्या निवाऱ्यासाठी असणाऱ्या या केंद्रात गंभीर गुन्ह्यातील हे चोरटे २० दिवसांपासून राहत असल्याने हे निवारा केंद्र बेघरांसाठी आहे, की चोरट्यासांठी; असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पिंपरी कॅम्प येथील वैष्णोदेवी मंदिरात चार दिवसांपूर्वी चोरट्यांनी मंदिराची दानपेटी फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. दरम्यान, चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून चोरी केली असल्याचे मंदिराचा सुरक्षारक्षक कमलबहादूर अग्रबहादूर शाही याने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलीस चौकशीमध्ये त्याच्या बोलण्यात विसंगती जाणवली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने साथीदारांना सोबत घेऊन चोरी घडवून आणल्याचे कबूल केले.
अधिक चौकशी केली असता, साथीदार कोण होते, कोठे राहत होते, याबाबतची माहिती समोर आली. सुरक्षारक्षकाने चोरीचा गुन्हा कबूल करून, सर्वजण महापालिकेच्या रात्र निवारा केंद्रात २० दिवसांपासून राहत असल्याचेही कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी लागलीच त्याच्या साथीदारांना रात्र निवारा केंद्रातून अटक केली. त्या ठिकाणीच चोरीचा कट आखला असल्याचेही सांगितले. दरम्यान, पोलिसांनी सुरक्षारक्षकासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली असून, उर्वरित तीन जण फरार आहेत.
निवाऱ्याची सोय असावी यासाठी महापालिकेने बेघरांसाठी पिंपरीत रात्र निवारा केंद्र उभारले आहे. नियमानुसार या ठिकाणी तीन ते चारच दिवस राहता येते. असे असतानाही चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेले नेपाळी १५ ते २० दिवस या ठिकाणी कसे राहिले. कुठल्या नियमानुसार त्यांना राहण्याची परवानगी दिली गेली? (प्रतिनिधी)