इंद्रायणी पुलावरील सुरक्षा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 02:31 IST2018-10-31T02:31:03+5:302018-10-31T02:31:36+5:30

आंदर मावळातील सुमारे ४० गावांना जोडणाऱ्या टाकवे-कान्हे जवळील इंद्रायणी नदी पुलावरील पुलाचे सुरक्षारक्षक खांब तुटले असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात असून, तातडीने सुरक्षारक्षक खांबांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

Ramabrose secured the Indrayani bridge | इंद्रायणी पुलावरील सुरक्षा रामभरोसे

इंद्रायणी पुलावरील सुरक्षा रामभरोसे

कामशेत : आंदर मावळातील सुमारे ४० गावांना जोडणाऱ्या टाकवे-कान्हे जवळील इंद्रायणी नदी पुलावरील पुलाचे सुरक्षारक्षक खांब तुटले असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात असून, तातडीने सुरक्षारक्षक खांबांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
मागील काही दिवसांपूर्वी या पुलावरून टाकवे औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीची बस या सुरक्षारक्षक खांबांना धडकून मोठा अपघात झाला होता. या पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले असून, येथे मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. इंद्रायणी नदीच्या या पुलावर वाहनचालकांची गैरसोय होत असल्यामुळे सेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेकडून रात्रीच्या वेळी वाहनचालकांना सुरक्षारक्षक सीमा निश्चित करावी, याकरिता रेडियम पट्टी लावण्यात आली आहे.
आंदर मावळमधील नागरिकांना हा पूल एकमेव दळणवळणाचे साधन आहे. काही वर्षांपासून आंदर मावळ परिसराचे दिवसेंदिवस विस्तारीकरण होत आहे. या भागात औद्योगिक वसाहती बरोबरच गृहप्रकल्पासाठी या भागात अनेक व्यावसायिक उद्योजक गुंतवणूक करत आहेत.

कान्हे व आंदर मावळला जोडणाºया या पुलाची रुंदी कमी असल्याने औद्योगिक वसाहतीतील मालवाहतूक वाहनांना मोठी अडचण होत आहे. तर मोठ्या गाड्या पुलावरून जात असताना एक साईटवरील वाहतुकीचा वेग चालकांना कमी करावा लागतो. यामुळे कित्येकदा पुलावर वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र दिसत आहे. नवीन पुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या आंदर मावळ नागरिकांसाठी इंद्रायणी पुलाच्या सुरक्षेसाठी तरी योग्य उपाययोजना प्रशासनाने कराव्यात, हीच सध्यातरी एकमेव अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Ramabrose secured the Indrayani bridge