मराठी वाङ्मयाचे उगमस्थान काव्यच!
By Admin | Updated: March 2, 2016 00:51 IST2016-03-02T00:51:37+5:302016-03-02T00:51:37+5:30
मराठी राजभाषा दिन व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून साहित्य कला आणि संस्कृती मंडळाने येथील लायन्स क्लबच्या सभागृहात

मराठी वाङ्मयाचे उगमस्थान काव्यच!
तळेगाव दाभाडे : मराठी राजभाषा दिन व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून साहित्य कला आणि संस्कृती मंडळाने येथील लायन्स क्लबच्या सभागृहात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित केले होते. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवयित्री स्वाती सामक यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून साप्ताहिक अंबरचे संपादक पं. सुरेश साखवळकर उपस्थित होते. उद्घाटन लायन्स क्लबचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी यांनी केले, तर शिक्षण मंडळ सभापती दिनेश शहा यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी संस्थेचे मुख्य विश्वस्त-अध्यक्ष अॅड. सहदेव मखामले व नवनिर्वाचित कार्याध्यक्ष पांडुरंग कार्लेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
कात्रज येथील विष्णू शिंदे यांच्या ‘माझ्या बालपणी’ या कवितेने कविसंमेलनास सुरुवात झाली. ‘खूप झालं, अहल्येची शिळा आता हलवायलाच हवी, साऱ्या जणींनी मिळून, आपणच आता आखूया लक्ष्मणरेषा नवी’ या बंडखोर विचारांची कविता औंध येथील डॉ. नंदा हरम यांनी सादर केली. जयश्री घळसासी यांनी ‘तू गेलास म्हणून काय झाले?’ ही निर्भीड विधवेची व्यथा मांडली; तर दौपदीच्या वस्त्रहरणाचा चित्रपट उभा करणारी दत्ता बांगर यांची कविता दाद घेऊन गेली. स्त्रीची अवहेलना होणार नाही असे शल्य ‘खात्री कोणी देईल का?’ या हृदयभेदक रचनेतून राजश्री खोले यांनी मांडले. (वार्ताहर)