- रोहिदास धुमाळहिंजवडी : मागील पंधरा दिवसांपासून हिंजवडी आयटी पार्क परिसरात मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प होत आहे, तर पावसामुळे रस्त्यांची अवस्था अधिक बिकट झाल्याने वाहतूकही मंदावली आहे. त्यामुळे आयटी पार्क परिसरात नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अक्षरशः सर्वच प्रमुख मार्गावर सहा ते सात किमी वाहनांच्या रांगा लागत असल्याने स्थानिकांसह आयटियन्स येथील प्रशासनाबाबत रोष व्यक्त करत आहेत.
मे महिन्याच्या अखेर झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि सध्या सुरू असलेल्या जोरदार मान्सूनची हिंजवडीसह आयटी परिसरात दमदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे येथील प्रशासनाची उदासीनता तसेच, अनेक पायाभूत समस्या चव्हाट्यावर आल्या आहेत. वरुणराजाच्या धो-धो बरसण्याने हिंजवडी आयटी पार्क परिसरातील पायाभूत सुविधांच्या कामाची पोलखोल झाली असून, येथे कार्यरत प्रशासन यातून काही धडा घेणार की नाही? असा उद्विग्न सवाल आयटियन्ससह स्थानिक विचारत आहेत.
आयटी पार्क परिसरातील समस्या :
- बाराही महिने उखडलेले खड्डेमय रस्ते
- संथगतीने सुरू असलेले मेट्रो मार्गिकेचे काम
- रस्त्यावर लेन मार्किंगचा अभाव
- अवजड वाहनांची दिवसभर वर्दळ
- बेशिस्त वाहतूक
- वाहतूक पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ
- नैसर्गिक नाले, ओढे, वगळ, चर झाले नष्ट
- नैसर्गिक जलप्रवाह मार्गावर अतिक्रमण
- चेंबर, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज चोकअप
- पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ठोस उपाययोजनांचा अभाव
- परिसरातील डोंगर, पठार विचारत न घेता केलेले रस्ते नियोजन.
- प्रशस्त आणि अतिक्रमणमुक्त सुरक्षित रस्ते.
- कार्यरत सर्व प्रशासकीय यंत्रणांचा एकमेकांशी समन्वयाचा अभाव.
येथे साचतेय रस्त्यावर पाणी
आयटी पार्क फेज तीनकडील डोंगर पठार बाजूचे रस्ते, फेज तीन ते फेज दोनपर्यंत मुख्य रस्ता, फेज दोनजवळील पद्मभूषण चौक परिसर, घोटावडे-माण रस्त्यावरील गवारे मळा, माणदेवी चौक, राक्षे वस्ती, बोडकेवाडी फाटा, शिवचा ओढा, वडजाईनगर तसेच, बोडकेवाडी फाटा ते जॉय व्हिला सोसायटी रस्ता, धुमाळ वस्ती पाणंद रस्ता, हिंजवडी हद्दीतील भटेवारानगर, विनोदे वस्ती तसेच भूमकर चौक अंडर पास याठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून वाहतूक कोंडी होत असते.
प्रामुख्याने येथील वाहतूक कोंडी समस्यांवर लक्ष दिले गेले पाहिजे. येथील सर्व रस्ते बाराही महिने सुस्थितीत असणे गरजेचे आहे. तसेच, किमान रहदारीच्यावेळी प्रमुख मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात असणे गरजेचे आहे. - अनुप मोरे, आयटी अभियंता, हिंजवडी आयटी पार्क
सुमारे ६० टक्के आयटी पार्कचा भाग माण ग्रामपंचायत हद्दीत येतो. एमआयडीसी हद्दीतील रस्त्यांची वाट लागली आहे. तेथील कचरा, सांडपाणी समस्यासुद्धा आहेत. प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार करूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. - अर्चना आढाव, सरपंच, आयटीनगरी माण