पिंपरी :अपघात झाल्याबाबतचा मेसेज आला अन् काळजाचा ठोका चुकला. काहीतरी अघटित घडले असल्याची पाल मनात चुकचुकली. मी लागलीच दुसऱ्या मित्रांना याबाबत माहिती दिली. त्यांनी अपघातस्थळी जाऊन १५ मिनिटांनी फोन केला. आपल्या तीन मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले अन् मी पुरता हादरलो, असे सांगत रावेत येथील सार्थक तुपे यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील काही तरुण तीन कारमधून लेह-लडाख येथे फिरायला गेले होते. त्यातील एका कारला राजस्थानातील कोटा शहराजवळ बुधवारी (दि. १८ मार्च) अपघात झाला. यात कारमधील कुणाल चोरडिया (रा. चिंचवडगाव), मयुरेश पाडाळे (रा. म्हाळुंगे पाडाळे, ता. मुळशी), सिद्धांत आल्हाट (रा. आल्हाटवस्ती, वाकड) या तिघांचा मृत्यू झाला. या तिघांचा मित्र असलेले सार्थक तुपे म्हणाले, आमचे काही मित्र फिरायला गेले त्यावेळी त्यांनी मलाही सोबत येण्यासाठी आग्रह केला होता. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे गेलो नाही. मात्र, मी दररोज त्यांच्या संपर्कात होतो.
सार्थक तुपे यांनी सांगितले, सर्व मित्रांच्या तीन कार सोबत होत्या. मात्र, महामार्गावर एका ठिकाणी दोन कार थांबल्या. त्याच वेळी पुढे गेलेल्या कारला अपघात झाला. त्या कारमधील सिद्धांत आल्हाट याच्या मोबाइल फोनमध्ये आपत्कालीन (इमर्जन्सी) मदतीसाठी माझा मोबाइल क्रमांक ‘सेव्ह’ होता. त्यामुळे बुधवारी सकाळी १०:०५ वाजता माझ्या मोबाइलवर ‘एसएमएस’ आला. सिद्धांत आल्हाट असलेली कार ‘क्रॅश’ झाल्याचा तो मेसेज होता. त्यामुळे क्षणभर मला काही सुचले नाही. मात्र, मी लगेचच दुसऱ्या कारमध्ये असलेल्या आयुष बारणे याला फोनवरून माहिती दिली. त्यानंतर दोन्ही कार घटनास्थळी पोहोचल्या. तेथे सिद्धांत आल्हाटच्या कारला अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही लोक कारमधून तिघांना बाहेर काढून मदतकार्य करत होते. ते दृश्य पाहून आयुष बारणे, आयुष गावडे यांनाही काही सुचेनासे झाले.
‘हे भलतेच विपरीत घडले’
आयुष गावडे याने मला फोनवरून अपघाताबाबत सांगितले. तुम्ही ताबडतोब इकडे या, असे तो म्हणाला. हे भलतेच विपरीत घडल्याने मी पुरता हादरलो. मात्र, कसाबसा सावरलो. सिद्धांतचा मोठा भाऊ रोहन आल्हाट यांना अपघाताबाबत मी फोनवरून माहिती दिली. त्यानंतर कुणाल चोरडिया आणि मयुरेश पाडाळे यांच्या नातेवाइकांनाही माहिती दिली.
अद्ययावत तंत्रज्ञानामुळे लागलीच मिळाली माहिती
सिद्धांत आल्हाट याच्या फोनमध्ये इमर्जन्सी नंबर सेव्ह असल्याने या अपघाताबाबत लागलीच माहिती मिळू शकली. अन्यथा अपघाताबाबत माहिती मिळण्यास विलंब झाला असता. इमर्जन्सी नंबर सेव्ह असल्यामुळे या अपघाताची माहिती सर्वांत आधी सार्थक तुपे यांना मिळाली. त्यांनी लागलीच नातेवाइकांना माहिती दिली. मोबाइल फोनमधील अद्ययावत तंत्रज्ञानामुळे ही माहिती त्याच क्षणी मिळणे शक्य झाले.
Web Summary : A Rajasthan car crash killed three friends from Pimpri-Chinchwad. An emergency alert on a victim's phone notified a friend, who then alerted families after the accident occurred during a Leh-Ladakh trip.
Web Summary : राजस्थान में एक कार दुर्घटना में पिंपरी-चिंचवड के तीन दोस्तों की मौत हो गई। एक पीड़ित के फोन पर इमरजेंसी अलर्ट ने एक दोस्त को सूचित किया, जिसने लेह-लद्दाख यात्रा के दौरान दुर्घटना होने के बाद परिवारों को सतर्क कर दिया।