लोकशाही मूल्यांच्या जागृतीची गरज
By Admin | Updated: November 16, 2015 01:47 IST2015-11-16T01:47:48+5:302015-11-16T01:47:48+5:30
गेल्या वर्षभरात पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, डॉ. अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी जास्तच चर्चा घडविली जात आहे.

लोकशाही मूल्यांच्या जागृतीची गरज
पिंपरी : गेल्या वर्षभरात पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, डॉ. अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी जास्तच चर्चा घडविली जात आहे. त्यातून नेहरू आणि काँग्रेसविषयी द्वेष पसरविण्याचा आणि इतिहास बदलून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा हल्ला परतवून लावण्याची व नेहरू, गांधींच्या लोकशाही मूल्ल्यांची माहिती समाजात देऊन जागृती निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी चिंचवड येथे केले.
पंडित जवाहरलाल नेहरू आणि आद्य क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पार्टीच्या वतीने चिंचवड चापेकर चौकातील पक्ष कार्यालयातील कार्यक्रमात महाजन बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष सचिन साठे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला शहराध्यक्षा ज्योती भारती, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष संदेश नवले, पर्यावरण सेलचे अध्यक्ष अशोक मोरे, चिंतामणी सोंडकर, मयूर जैसवाल, संकेत जगताप, हरी नायर, बाबासाहेब बनसोडे, एनएसयूआय सरचिटणीस विशाल कसबे, वर्षा झपके, बिंदू तिवारी, सुनेत्रा पवार, सुनील राऊत, जनार्दन पोलकडे, रियाज शेख, वीरेंद्र गायकवाड, आबा खराडे आदी उपस्थित होते.
महाजन म्हणाले, ‘‘नेहरू यांनी देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून जेव्हा शपथ घेतली, तेव्हा धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्था निर्माण करणे, हे त्यांच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान होते. नेहरू संसदेत नेहमी हजेरी लावत. संसदेविषयी लोकांमध्ये आदर व सन्मान निर्माण होईल, असे त्यांचे वर्तन होते.
सहिष्णुतेचे मूल्य बाळगणाऱ्या नेहरूंनी आपल्या भिन्न विचारांच्या विरोधकांविषयीदेखील कधीही कटुता बाळगली नाही. राम मनोहर लोहिया व नेहरू प्रथमत: एकत्र होते. परंतु, नंतर लोहिया विरोधात गेले. तरीही नेहरूंनी त्यांच्यावर कधीही व्यक्तिगत टीका केली नाही. न्याय्य मार्गाने, न्यायपूर्व धर्म मार्गाने, धर्मनिरपेक्ष समाज निर्माण करणे, हे महात्मा गांधीचे स्वप्न नेहरूंनी सत्यात आणले.’’ (प्रतिनिधी)