उद्योगनगरीला झळाळी
By Admin | Updated: January 19, 2016 01:42 IST2016-01-19T01:42:20+5:302016-01-19T01:42:20+5:30
यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १५ ते १८ जानेवारी या कालावधीत पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत झाले. सारस्वतांचे हे संमेलन सर्वार्थाने उद्योगनगरीला झळाळी देणारे ठरले.

उद्योगनगरीला झळाळी
संजय माने, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी
यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १५ ते १८ जानेवारी या कालावधीत पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत झाले. सारस्वतांचे हे संमेलन सर्वार्थाने उद्योगनगरीला झळाळी देणारे ठरले. संमेलनाच्या निमित्ताने राजकारण, समाजकारणातील, साहित्य क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी शहराला भेट दिली. विविध विषयांवर विचारमंथन घडून आले. देशाच्या, राज्याच्या कानाकोपऱ्यातून साहित्य रसिक म्हणून लाखो नागरिकांनी हजेरी लावली. विकासाकडे झेपावणारी उद्योगनगरी म्हणून परिचित असलेल्या या शहराची चार दिवसांत अनेकांना जवळून ओळख झाली. शहराकडे सर्वांचे लक्ष वेधण्यास हे संमेलन निमित्त ठरले असून, शहराच्या पुढील उज्ज्वल वाटचालीचा मार्ग सुकर बनला आहे.
हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्सच्या भव्य मैदानावर चार दिवसांचा सारस्वतांचा महामेळा दिमाखात
पार पडला. डॉ. डी. वाय.
पाटील विद्यापिठाचे डॉ. पी. डी. पाटील यांच्यामुळे शहरात हा सोहळा घडून आला.
संमेलनस्थळाहून शहरात फेरफटका मारण्यासाठी महापालिकेने खास बससुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे संमेलनातील कार्यक्रम, चर्चासत्र याचा आस्वाद घेण्याबरोबर अनेकांनी महापालिकेच्या विविध प्रकल्पांना भेट दिली. सिंगापूर सिटीचा आभास व्हावा, असे चित्रण असलेली शहराच्या विकासावर दृष्टिक्षेप टाकणारी ध्वनिफित महापालिकेने संमेलनस्थळी दाखवली होती. त्यानंतर अनेकांना शहरातील प्रकल्पांना भेटी देण्याचा मोह आवरला नाही. दुर्गादेवी टेकडी उद्यान, झोपडीवासीयांचे पुनर्वसन प्रकल्प,मध्यमवर्गीयासाठी साकारलेला घरकुल प्रकल्प, ठिकठिकाणचे जलतरण तलाव, खाणीवर विकसित केलेली उद्याने, प्रेक्षागृह,सहल केंद्र, ध्यान केंद्र, ज्येष्ठ नागरिकांची विरंगुळा केंद्र, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी सक्षम यंत्रणा, भुयारी गटारे हे सर्व भेटी देणाऱ्यांसाठी थक्क करणारे होते. प्रकल्प पाहण्यासाठी फेरफटका मारताना दळणवळण सुविधेसाठी सक्षम ठरलेले उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर,प्रशस्त रस्ते हे अनुभव विकसित शहर आणि नागरी जीवन समृद्ध करण्यास पूरक असल्याचे अनेकांना मनोमन पटले. शासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या प्रशासकीय आणि राजकीय व्यकतींनी या शहराच्या नियोजनबद्ध विकासाची नोंद घेतली.