जाहिरात फलकांचा निगडीत झाडांना विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 03:38 IST2018-12-14T03:38:32+5:302018-12-14T03:38:42+5:30
पर्यावरणरक्षणासाठी झाडांचे अतिशय महत्त्व असताना जाहिरातबाजांना त्याचा विसर पडला आहे.

जाहिरात फलकांचा निगडीत झाडांना विळखा
निगडी : पर्यावरणरक्षणासाठी झाडांचे अतिशय महत्त्व असताना जाहिरातबाजांना त्याचा विसर पडला आहे. चौक, बसथांबे, इमारती आदी ठिकाणी जाहिरात ही नित्याचीच बाब असली, तरी झाडांवर खिळे ठोकून अनेक जण जाहिराती करीत असल्याचे आकुर्डी, निगडी, प्राधिकरण, यमुनानगर आदी भागात वास्तव समोर आले आहे.
झाडांवरील जाहिरातींमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये असंतोष उसळला आहे. शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये आदी भागात सुशोभीकरण आणि शीतल छाया मिळावी, यासाठी झाडे लावण्यात आली आहेत. काही झाडे पुरातन असल्याने त्यांचा आवाकाही मोठा झाला आहे. मात्र या मोठ्या वृक्षांचा काही महाभागांनी जाहिरातीसाठी वापर केला आहे. काही शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालयात झाडांवर कायमस्वरुपी जाहिराती झळकत असल्याचे चित्र आहे. जाहिरातफलक लावण्यासाठी झाडांना खिळे ठोकून ते लावण्यात आले आहे.
परिसरातील छोट्या-मोठ्या हॉटेलसमोरील झाडांवर व जाहिरात फलकांवर रोषणाईदेखील केली जाते. महापालिका अधिकाऱ्यांना, कर्मचाºयांना झाडांवर जाहिराती दिसत असताना कारवाई का केली जात नाही, याबाबत पर्यावरणप्रेमी शंका व्यक्त करीत आहेत. एकीकडे शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘वनसंपदेचे संवर्धन करा’ अशा घोषणा देत पर्यावरण सुरक्षेचे धडे देते. मात्र दुसरीकडे झाडांचा जाहिरातीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
राज्यात १३ टक्के कमी वनाच्छादन
भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वन आच्छादन असणे आवश्यक आहे. परंतु राज्यात एकूण २० टक्के वनाच्छादन असल्याची आकडेवारी आहे. त्यामुळे तापमानात वाढ, वातावरणात बदल, बदललेले नैसर्गिक ऋतुचक्र, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वाढता दुष्काळ अशा गंभीर समस्यांच्या सामोरे जावे लागत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्यात राबविला.
फलकांसाठी झाडांची छाटणी
परिश्रम, मेहनतीने वाढविण्यात आलेल्या वृक्षावर खिळे ठोकून जाहिरातफलक लावण्यात येते. फ्लेक्स लावण्यात अडथळा निर्माण झाल्यास प्रसंगी झाडाच्या फांद्याही छाटल्या जातात. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. महापालिकेने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. रस्त्यालगत झाडांवर खिळे मारून जाहिरात करणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्यात, यावी अशी मागणी होत आहे.
काही झाडांवर खिळे ठोकता येत नाहीत. तरीदेखील शहरात राजरोसपणे झाडांवर खिळे ठोकून जाहिरातींचे फलक लावले जातात. ही बाब नियमबाह्य आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने संबंधितांवर कडक कारवाई करावी.
- दयानंद गौडगाव,
पर्यावरणप्रेमी, निगडी