महामार्ग पोलिसांच्या नशिबी खटारा वाहने
By Admin | Updated: August 7, 2015 00:41 IST2015-08-07T00:41:07+5:302015-08-07T00:41:07+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असो, नाही तर राष्ट्रीय महामार्ग; या महामार्गावर सुरक्षेची ग्रस्त घालणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या वाट्याला मात्र शासनाने अक्षरश

महामार्ग पोलिसांच्या नशिबी खटारा वाहने
विशाल विकारी , लोणावळा
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असो, नाही तर राष्ट्रीय महामार्ग; या महामार्गावर सुरक्षेची ग्रस्त घालणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या वाट्याला मात्र शासनाने अक्षरश: खटारा वाहने दिली आहेत़ जी वाहने टाकाऊ होतात, ती महामार्ग पोलिसांच्या नशिबी पडत असल्याने त्यांचा उपयोग कमी व त्रासच जास्त होत आहे़ केवळ द्रुतगती व राष्ट्रीय महामार्गावर ही समस्या नाही, तर राज्यातील बहुतांश महामार्ग पोलिसांची व टॅबची हीच अवस्था आहे़
मागील काही दिवसांपासून द्रुतगती महामार्गावरील दरड कोसळून वारंवार खंडाळा घाट ते खोपोली दरम्यान वाहतूककोंडी होत असल्याने महामार्ग पोलिसांना दिवस-रात्र या परिसरात पहारा द्यावा लागत आहे़ मात्र, हे करत असताना त्यांना वाहन बंद केले, तर पुन्हा धक्का मारल्याशिवाय चालू करता येत नाही. अथवा वाहन दिवसभर चालूच ठेवून इंधनाचा चुराडा करावा लागत आहे़ द्रुतगती महामार्गावरून सातत्याने व्हीआयपींचे दौरे सुरू असतात. त्यांची पायलेटिंग करताना या मंडळींना जीव धोक्यात घालून ही खटारा वाहने पळवावी लागतात़ व्हीआयपींची वाहने व पोलिसांची वाहने यांच्यात हद्द संपेपर्यंत दीड ते दोन किमीचे अंतर असते. मात्र, कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांना जीव धोक्यात घालावा लागतो.
वास्तविक महामार्ग पोलिसांना महामार्गावर सतत पेट्रोलिंग करावे लागते. वाहनांचा पाठलाग करणे, अपघातांच्या ठिकाणी तातडीने पोहोचणे, काही घटना घडल्यास स्थानिक पोलिसांच्या अगोदर महामार्ग पोलिसांना घटनास्थळी पोहोचून परिस्थिती सांभाळावी लागते़ मात्र, तरीही त्यांच्या नशिबी अशी खटारा वाहने दिली काही वाहनांची पाहणी केली असता, त्यांचे टायर गोटा झाले आहेत़ स्टार्टर खराब झाला असल्याने वाहन बंद करता येत नाही. धक्का मारल्याशिवाय चालू होत नाही़ गाडीचे सीट व दरवाजाचे कुशन फ ाटले आहे़ वायपर नीट काम करत नाही़ वाहनांना गोल वेढ्यावर रेडियम लावण्यात आले आहे़ किमान रात्री अन्य वाहनचालकांना समोर गाडी चालली आहे, हे कळावे यासाठीचा हा खटाटोप असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले़ महामार्ग व राष्ट्रीय महामार्गाचे रक्षण करणाऱ्या महामार्ग पोलिसांकडे शासन लक्ष देणार की नाही, हा मोठा प्रश्न आहे़