गावकीच्या कारभारात तरुणाई
By Admin | Updated: August 7, 2015 00:42 IST2015-08-07T00:42:37+5:302015-08-07T00:42:37+5:30
गावाच्या कारभारात सक्रिय सहभाग देण्यासाठी यंदा प्रथमच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तरुणाईने सक्रिय सहभाग घेतला.निवडणूक निकालात

गावकीच्या कारभारात तरुणाई
पुणे / मावळ : गावाच्या कारभारात सक्रिय सहभाग देण्यासाठी यंदा प्रथमच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तरुणाईने सक्रिय सहभाग घेतला.निवडणूक निकालात त्याचे प्रतिबिंब उमटले असून, अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देऊन तरुण उमेदवार निवडून आले आहेत. उच्चशिक्षित उमेदवारांचे प्रमाणही लक्षणीय आहे. मावळातील ग्रामपंचायतींवर भाजपाने वर्चस्व राखले.
मावळातील ५० ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पक्षाने ३२ ग्रामपंचायतींवर, तर राष्ट्रवादीने २८ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. भाजपाने तालुक्यातील ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविण्यात यश मिळविले आहे. त्यात तरुणांचा सहभाग अधिक आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल गुरुवारी सकाळी लागला. कोणाची सत्ता येणार, याबाबत उत्सुकता होती. कोथुर्णेत भाजपाची, तर नवलाख उंब्रे व सोमाटणे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आली. त्यात भाजपा, शिवसेना व आरपीआय युतीच्या तीन ग्रामपंचायती आल्या असल्याची दावा भाजपा तालुकाध्यक्ष रामनाथ वारिंगे यांनी केला. तर, २८ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता स्थापन झाल्याची माहिती राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबन भेगडेंनी दिली.
५० ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज व कुणबीची जादू चालल्याने पक्षांना आपापल्या ग्रामपंचायतीत सत्ता टिकविण्यात यश आल्याचे राजकीय नेते बोलत आहेत. निवडून आलेल्यांत तरुणांची संख्या अधिक आहे. गावकी व भावकीवर या ग्रामपंचायतींच्या निवडणुका अवलंबून असल्याने गावाच्या विकासासाठी व शांततेसाठी अनेक आजी-माजी सदस्यांनी बिनविरोध वॉर्ड निवडून आणले आहेत. पक्षातील सर्वच श्रेष्ठी एकत्र असतात. त्यात गावात पक्षवाद नको, गावाचा विकास महत्त्वाचा असल्याने गावातील नागरिकांनी पक्षनिरपेक्ष विचार केला असल्याचे दिसत आहे. अनेक ग्रामपंचायतींत पक्षाचे प्राबल्य अधिक असून, सरपंचपदाचा दावेदार नसल्याने सत्ता इतरत्र जाण्याची शक्यता असल्याने सरपंच ज्या पक्षाचा त्या पक्षाची सत्ता असणार आहे. भाजपा व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आमचेच प्राबल्य अधिक असल्याचा दावा करत आहेत. तालुक्यातील ताजे , कुरवंडे , कुसगाव पमा , आढे , उर्से , करंजगाव , बऊर , साई , गहुंजे , वारू , येलघोल , शिवली , शिवणे , थुगाव , तिकोणा , आजिवली , माळेगाव बुद्रुक , नाणे , वेहरगाव , सोमाटणे , दारुंब्रे , खांडशी , शिरदे , आपटी , महागाव , कार्ला , साते , टाकवे बुद्रुक , वडेश्वर , आंबी , चिखलसे , कशाळ , नवलाख उंब्रे , डाहुली , धामणे , सांगवडे , परंदवडी , कुसगाव खुर्द , घोणशेत , उकसान , मळवंडी ठुले , कोथुर्णे , मोरवे , येळसे , पाटण , मळवली व कुसगाव बुद्रुक यांपैकी खांड, पाचाणे व आढले खुर्द या ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
मुळशी तालुक्यात प्रस्थापितांची बाजी
वाकड : मुुळशी तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सर्वपक्षीय ग्रामदैवत म्हातोबा ग्रामविकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविले. मुळशी तालुक्यात झालेल्या २९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा प्रस्थापितांनी बाजी मारली असून, बऱ्याच ग्रामपंचायतींवर घराणेशाहीला मतदारांनी धूळ चारली आहे. अतिशय चुरशीच्या माण गावातही जनसेवा विकास पॅनलने बाजी मारत, सत्ताधाऱ्यांना धोबीपछाड करीत गावाचा गड काबीज केला आहे. जांबेत भैरवनाथ ग्रामविकास पॅनलला बहुमत दिले आहे.
चाकणला चार माजी सरपंचांना धक्का
चाकण : मेदनकरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत चार माजी सरपंचांना पराभवाचा धक्का बसला असून, बाजार समितीचे संचालक, माजी सरपंच व भाजपाचे नेते रामदास मेदनकर यांच्या कुटुंबातील पती-पत्नी व मुलगी असे तीन उमेदवार व गावातील आणखी दोन पती- पत्नींच्या जोड्या विजयी झाल्या आहेत. ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शांताराम मेदनकर, उत्तम आगरकर, दत्तात्रय भुजबळ व माजी उपसरपंच जयश्री दत्तात्रय भुजबळ दाम्पत्य यांना मतदारांनी घरी बसविले आहे ; तर बाजार समितीचे संचालक, माजी सरपंच व भाजपाचे नेते रामदास मेदनकर, त्यांच्या पत्नी सुरेखा व मुलगी प्रियंका मेदनकर हे तिघेही निवडून आले आहेत. तसेच कावेरी संदीप मेदनकर व संदीप शांताराम मेदनकर आणि सविता संजय चाबुकस्वार व संजय मंजाबा चाबुकस्वार या पती-पत्नींच्या जोड्या निवडणुकीत निवडून आल्या आहेत. माजी सरपंच सुभाष भुजबळ यांच्या पत्नी अनुराधा भुजबळ यांच्यासह विद्यमान सरपंच नंदाराम भुजबळ, माजी सरपंच बलराम मेदनकर व माजी सरपंच रामदास मेदनकर यांना मतदारांनी पुन्हा स्वीकारले आहे. (वार्ताहर)