- देवराम भेगडे
देहूरोड : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा पहिला विसावा ठरणाऱ्या चिंचोली ते अशोकनगर मार्गावर आता हिरवाईने नटलेला एक सुंदर पालखी मार्ग पाहायला मिळतो आहे. या मार्गावर लावण्यात आलेल्या ३५० हून अधिक झाडांची जोपासना स्थानिक नागरिक, युवक, सामाजिक संस्था आणि लष्करी प्रशासनाच्या सहकार्याने नियमितपणे केली जात आहे.
पालखी सोहळा देहूगावातून निघाल्यावर चिंचोलीतील पादुका मंदिर परिसरात पहिला थांबा घेतो. येथे तुकोबांच्या अभंग आरतीनंतर हजारो वारकरी व भाविक यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. या ठिकाणी वारकरी काही वेळ विसावा घेतात, त्यामुळे परिसरात सावलीची मोठी गरज भासत होती.
ही गरज लक्षात घेऊन डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे या मार्गावर झाडे लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला. सुरुवातीला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला, तर पुढे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने झाडांची नियमित देखभाल व सिंचन सुरू राहिले. यामध्ये चिंचोलीतील युवकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय आहे.
आज या झाडांची वाढ चांगल्या प्रमाणात होत असून, चिंचोली ते अशोकनगर परिसर हरित पट्टा म्हणून विकसित होत आहे. लष्करी वसाहतीलगत असलेल्या या मार्गावरून दरवर्षी हजारो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. या झाडांमुळे आता त्यांना निसर्गस्नेही व सावलीचा मार्ग मिळत आहे. हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरकच नाही, तर सामूहिक प्रयत्नातून साधलेले एक यशस्वी उदाहरण आहे. पालखी मार्ग हरित करणारा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरतो आहे.