रावेत बंधारा येथील पवनामाई जलपर्णीमुक्त अभियानात गौरी किर्लोस्कर होणार सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 15:39 IST2018-02-09T15:36:40+5:302018-02-09T15:39:38+5:30
रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने 'जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई' हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाला सुमारे तीन महिने पूर्ण होत आहेत.

रावेत बंधारा येथील पवनामाई जलपर्णीमुक्त अभियानात गौरी किर्लोस्कर होणार सहभागी
रावेत : रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने 'जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई' हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाला सुमारे तीन महिने पूर्ण होत आहेत.
पवनामाई जलपर्णीमुक्त अभियान रावेत बंधारा येथे राबविण्यात येणार आहे. या जलपर्णी मोहिमेत किर्लोस्कर वसुंधरा इको बाजारच्या संचालिका गौरी किर्लोस्कर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रो. हेमंत गावंडे यांनी दिली. रोटरी क्लब आॅफ वाल्हेकर वाडीच्या वतीने जलपर्णीमुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई हे अभियान सुरु आहे. येत्या रविवारी दि. ११ फेब्रुवारी रोजी रावेत बंधारा येथे सकाळी ८ वाजता किर्लोस्कर समूहाच्या संचालक आणि निरीक्षक असलेल्या गौरी किर्लोस्कर सहभागी होणार आहेत. या अभियानाचा हा १०० वा दिवस आहे. या अभियानाला ३ महिने पूर्ण झाली असून यात आजपर्यंत सावरकर मंडळ, PCCF, शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन, देवराई फौंडेशन, निसर्गराजा, जीविधा, पवना जलदिंडी, भावसार व्हिजन पोलीस मित्र मंडळ ज्येष्ठ नागरिक संघ यासारख्या सामाजिक संस्था, महिला बचत गट व शहरातील अनेक मान्यवर व्यक्तींनी यात सहभाग घेतला. आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावलेली आहे.
उपक्रमास दर रविवारी साधारणपणे ३००-४०० नागरिकांचा सक्रीय सहभाग असतो. निसर्गप्रेमी असणाऱ्या गौरी किर्लोस्कर या कार्यक्रमात आपले योगदान देण्यासाठी अतिशय उत्सुक असून शहरातील नागरिकांनी देखील जास्तीत जास्त संख्येने या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष रो. प्रदीप पोपटराव वाल्हेकर यांनी केले आहे.