लक्ष्मण जगताप यांच्या आश्वासनानंतर वाल्हेकर वाडीतील बाधितांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 17:18 IST2017-11-18T17:14:25+5:302017-11-18T17:18:25+5:30
आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांच्या घराच्या बाबतीत असणारी मागणी संबंधित प्रशासनाशी चर्चा करून सोडविण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणाला बसलेल्या नागरिकांनी उपोषण अखेर शुक्रवारी संध्याकाळी मागे घेतले.

लक्ष्मण जगताप यांच्या आश्वासनानंतर वाल्हेकर वाडीतील बाधितांचे उपोषण मागे
रावेत : गेल्या ५ दिवसांपासून रस्त्यातील बाधित घर वाचविण्याच्या मागणीसाठी वाल्हेकर वाडीतील दत्त मंदिरासमोर बाधितांनी आमरण उपोषण सुरू केले होते. आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांच्या घराच्या बाबतीत असणारी मागणी संबंधित प्रशासनाशी चर्चा करून सोडविण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणाला बसलेल्या नागरिकांनी उपोषण अखेर शुक्रवारी संध्याकाळी मागे घेतले.
वाल्हेकरवाडी-रावेत या मार्गावरील काही घरे रस्त्यात जाणार आहेत. ही घरे वाचावीत अथवा घराच्या बदल्यात घर अथवा जागा प्रशासनाने द्यावे या मागणी करिता सुरू असलेले आमरण उपोषण ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसेविका करुणा चिंचवडे, माजी नगरसेवक शामराव वाल्हेकर, शिवसेनेचे सल्लागार भगवान वाल्हेकर, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर चिंचवडे, चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, हेमंत ननवरे, बिभिषण चौधरी, रामदास केंदळे आदींच्या उपस्थित उपोषण मागे घेतले.
मागील दोन वर्षापासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहा पदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणापासून ते ओढ्यापर्यंतच्या भागाचे रस्त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचे भूसंपादन झाले नसल्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. रस्ता-रुंदीकरणामध्ये जाणारी काही बैठी घरे बाधित होत आहेत. त्या घरांना खाली करण्याच्या प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. त्यावर बधितांनी आम्ही १९६५ मध्ये ग्रामपंचायतची परवानगी घेऊन घरे बांधली आहेत ही आमची घरे अनधिकृत व रस्ता बाधित कसे ठरतात या बाबत आम्हाला प्रशासनाने न्याय द्यावा व आम्हाला घराच्या बदल्यात घरे द्यावीत या मागणी करिता वाल्हेकरवाडी येथील नागरिकांनी उपोषण सुरू केले होते.
शशिकांत खाडे, प्रवीण देशमुख, अरुण देशमुख, पोपट खडतरे, बाळासाहेब गुळुंजकर, शरद पवार, हसीना शेख, शारदा नाईकनवरे, कमल शिंपी, मंदा सरोदे, माधुरी वायकर, नदाफ पठाण, शोभा इंगळे आदी आमरण उपोषण करीत होत. नामदेव ढाके, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, सचिन शिवले, नाना मरळ, छावाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील आदींनी भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली होती.