पाणी आरक्षणाला मुदतवाढ, जलसंपदा विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:23 IST2018-10-25T01:23:25+5:302018-10-25T01:23:28+5:30
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना धरणातून ४८.५७६ दशलक्ष घनमीटर, भामा-आसखेड धरणातून ६०.७९ दशलक्ष घनमीटर आणि आंद्रा धरणातून ३८.८७ दशलक्ष घनमीटर असा एकूण १४८.२३६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणास मुदतवाढ देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने आज (बुधवारी) घेतला.

पाणी आरक्षणाला मुदतवाढ, जलसंपदा विभाग
पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना धरणातून ४८.५७६ दशलक्ष घनमीटर, भामा-आसखेड धरणातून ६०.७९ दशलक्ष घनमीटर आणि आंद्रा धरणातून ३८.८७ दशलक्ष घनमीटर असा एकूण १४८.२३६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणास मुदतवाढ देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने आज (बुधवारी) घेतला.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून शंभर टक्के पाणीपुरवठा करण्यात येतो. साधारण दररोज ४८० एमएलडी पाणी शहरासाठी घेत असते. मात्र, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सद्य:स्थितीत सुमारे २२ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे भविष्यात वाढणारी लोकसंख्या आणि वाढते शहरीकरण विचारात घेऊन भामा-आसखेड धरणातील १६७ एमएलडी आणि आंद्रा धरणातील १०० एमएलडी पाणी आरक्षित ठेवले होते.
दरम्यान, महापालिकेने पाटबंधारे विभागाशी करारनामा न केल्याने आणि सन २०१६-१७ मधील भाववाढ निर्देशानुसार पाण्यासाठी आरक्षित सिंचन पुनर्स्थापन रक्कम २३८.५३ कोटी रुपये भरण्यात आलेली नाही. त्यामुळेच भामा-आसखेड व आंद्रा धरणातील पाण्याचे आरक्षण रद्द केल्याचे पत्र पुणे पाटबंधारे मंडळाने आयुक्त हर्डीकर यांच्याकडे २७ जुलै २०१७ रोजी दिले होते. याबाबत आयुक्त हर्डीकर यांनी भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातून आरक्षित पाणी करारास मुदतवाढ देण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी चर्चा केली होती. टप्प्याटप्प्याने तो खर्च भरला जाईल,असा प्रस्ताव पाठविला होता, अशी माहिती महापौर राहुल जाधव व एकनाथ पवार यांनी दिली.
>भविष्यात शहराची वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन धरणातील पाणी आरक्षणाच्या करारास मुदतवाढ मिळाल्याने आंद्रा व भामा-आसखेड प्रकल्पाची कामे तत्काळ सुरू करण्यात येतील. तसेच या निर्णयाने शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यास निश्चित मदत होणार आहे.
- एकनाथ पवार, सत्तारूढ गटनेते, भाजपा