जैन धर्माचा इतिहास तंत्रज्ञानाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:42 IST2019-06-03T01:42:52+5:302019-06-03T01:42:58+5:30

सिद्धार्थ जबडे : जैन साहित्य इतिहास परिषदेचा समारोप; डिजिटल साहित्य निर्माण करण्याची गरज व्यक्त

Extend the history of Jain religion with the help of technology | जैन धर्माचा इतिहास तंत्रज्ञानाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवा

जैन धर्माचा इतिहास तंत्रज्ञानाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवा

पिंपरी : जैन धर्माचा इतिहास, तत्त्वज्ञान व शिकवण ही सध्याच्या बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वांपर्यंत पोहोचवायला हवी, असे प्रतिपादन विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धार्थ जबडे यांनी केले. थेरगाव येथे सकल जैन समाज पिंपरी-चिंचवड आयोजित महाराष्ट्र जैन साहित्य इतिहास परिषदेच्या दोन दिवसीय अधिवेशनाचा समारोप रविवारी झाला. अध्यक्षस्थानी डॉ. महावीर अक्कोळे होते. या वेळी महाराष्ट्र जैन इतिहास परिषदेचे संस्थापक श्रेणिक अन्नदाते, अधिवेशन संयोजन समितीच्या अध्यक्षा प्रा. सुरेखा कटारिया आदी उपस्थित होते.

जबडे म्हणाले, अधिवेशनात जैन धर्माचा इतिहास व जगाचा इतिहास यांचा मेळ घालण्यात आला. सध्याचे डिजिटल युग आहे. युवा पिढी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करीत आहे. या मोठ्या बदलाचे आपण भागिदार आहोत. सध्या तंत्रज्ञान बदलत असून, या बदलत्या तंत्रज्ञानाशी सांगड घालून पुढच्या पिढीला जैन धर्माच्या इतिहासाची समृद्धी आपण देणे गरजेचे आहे. सध्याची पिढी वाचनाऐवजी मोबाइलवर व्हिडिओ व ऑडिओ ऐकण्यास प्राधान्य देते. या डिजिटल युगात इतिहासाची माहिती देणारे व्हिडिओ, ऑडिओ तयार करून युवा पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

डॉ. अक्कोळे म्हणाले, इतिहासाचे काम केवळ भूतकाळातील घटनांची नोंद करणे नव्हे, तर भूतकाळातील संदर्भ देऊन वर्तमान काळातील घटनांवर नजर ठेवून त्यांची नोंद ठेवणे, हेही महत्त्वाचे आहे. तत्पूर्वी झालेल्या सत्रात ‘शोधनिबंध वाचन’ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडित जितेंद्र राठी होते. वंदना अजमेरी यांनी ‘इतिहास-मांगीतुंगीचा’, महावीर उदगीरकर यांनी ‘मराठवाड्यातील जैन धर्म’ तर सीमा गांधी यांनी राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषी म. सा.’ या विषयावर विचार मांडले.

Web Title: Extend the history of Jain religion with the help of technology