पिंपरी : संतांनी दिलेला समतेचा विचार पायी वारी सोहळ्यातून पुढे नेला जात आहे. वारीत महिला आणि पुरुषांना जसा सन्मान मिळतो तोच सन्मान आम्हाला मिळाला पाहिजे कारण ही समतेची वारी आहे, यात कोणताही भेदाभेद नाही, ही संतांची शिकवण आम्ही अनुभवत आहोत, असे किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर डाॅ. दीपा राजमाने यांनी सांगितले.
पुणे येथील मंगलमुखी केंद्र किन्नर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पुढाकार घेण्यात आला असून त्यानुसार डाॅ. दीपा यांच्यासह आठ तृतीयपंथी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. पायी वारीचे त्यांचे हे तिसरे वर्ष आहे. डाॅ. दीपा आणि त्यांचे सहकारी रामकृष्ण हरी आणि जयहरी म्हणत अभंगांमध्ये दंग होत आहेत. वारीत ते लक्ष वेधून घेत असून अनेक जण त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी गर्दी करतात. तसेच अनेक जण त्यांचे आशीर्वाद देखील घेत आहेत.
डाॅ. दीपा म्हणाल्या, संतांनी भेदभाव केला नाही. तसेच वारीत सहभागी होण्यासाठी कोणालाही निमंत्रण दिले जात नाही. वारकरी आणि भाविक स्वत: उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. त्यामुळे आम्ही देखील संतांची शिकवण घेण्यासाठी वारीत सहभागी झालो. इतर वारकऱ्यांप्रमाणेच आम्हाला जेवण आणि मुक्कामाची व्यवस्था केलेली असते. त्यामुळे या भक्तीमय वातावरणाचा आनंद घेता येत आहे. आम्हालाही संतांची भक्ती करण्याचा आणि मानव धर्माची पताका खांद्यावर घेता येत आहे.
संत परंपरेत भेदभाव नाही
‘सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे’, असे संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या अभंगातून सांगितले आहे. त्याचप्रमाणे धर्म, जात, वर्ण असा भेदभाव संत परंपरेत केला जात नाही. त्यामुळे वारीत गरीब, श्रीमंत, महिला, पुरुष सहभागी होतात. त्याचप्रमाणे आम्ही देखील सहभागी झालो आाहेत, देहू ते पंढरपूर अशी पायी वारी करत आहोत, असे डाॅ. दीपा यांनी सांगितले.
पहिला मान आम्हालाच...
पहिल्यांदा आम्हाला वारीत सहभागी होण्यासाठी विरोध करण्यात आला. त्यानंतर दिंडी क्रमांक १३ मध्ये हभप गवळी महाराजांनी आम्हाला त्यांच्या दिंडीत सहभागी केले. त्यामुळे आमच्याशी बोलताना आता ‘माउली’ असे म्हणून इतर वारकऱ्यांसारखी वागणूक मिळत आहे. दिंडीत जेवणाचा, आरती, पूजा तसेच इतर सर्व कामांसाठी पहिला मान आम्हाला दिला जातो, ही आमच्यासाठी विशेष बाब आहे, असे डाॅ. दीपा यांनी सांगितले.