देहुगाव : शासकीय मदतीशिवाय वारकरी आणि सर्वसामान्य यांच्या योगदानातून श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर उभारले जात आहे. तुकोबांचे मंदिर भाविकांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक अध्यात्मिक केंद्र ठरणार आहे. मंदिर बांधकामासाठी सर्वोतपरी मदत करणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मध्यमातुन पाच कोटींचा निधी देऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. अप्रतिम आणि दिव्य मंदिर हजारो वर्ष टिकू शकेल. अयोध्येतील श्री राम मंदिरानंतर वारकरी संप्रदायाचे हे मंदिर आकर्षण असणार आहे. संत तुकाराम महाराजांची चरित्र हे भक्ती आणि वैराग्य सामाजिक समतेचा मूर्तिमंत आदर्श असल्याने त्यांनी यावेळी सांगितले आहे.
श्री क्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन आणि प्रस्थान सोहळा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुकोबारायांचे चिंतनस्थळ भंडारा डोंगरास सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याशी असलेल्या सव्वाशे एकर गायरान जमीन ताब्यात घेऊन वारकऱ्यांच्यासाठी सोयीसाठी सरकारतर्फे कॉरिडॉर विकसित केला जाईल. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. बांधकामाची माहिती घेत नियोजित मंदिर परिसराचे नियोजन, रचना याबाबत माहिती घेतली. संत तुकाराम महाराजांचे कार्य, विचार, वारसा अखंडपणे पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे, मंदिराची कामे वेळेत व गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी पवार यांनी सूचना केल्या.
बाळासाहेब काशीद पाटील म्हणाले, भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराज यांचे मंदिर होत आहे, वारकऱ्यांच्या मदतीने हे मंदिर साकारत आहे. राम मंदिरानंतर तुकोबारायांचे महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे मंदिर साकारत आहे. मंदिराच्या पायाथ्याशी असणाऱ्या जागेत विविध सेवा शासनातर्फे उभारण्यासाठी विकास आराखडा करावा, अशी शासनाकडे वारकऱ्यांनी मागणी केली आहे.