Man Ki Baat: अकबर, गुरु गोविंद सिंगांसह कश्मिरी केशरपर्यंत, मोदींच्या संबोधनातील 10 मोठे मुद्दे

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 27, 2020 12:59 PM2020-12-27T12:59:13+5:302020-12-27T13:10:57+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या आपल्या मन की बातच्या संबोधनात अनेक महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला. यावेळी मोदींनी कोरोना व्हायरस, लॉकडाउन आणि आत्मनिर्भता, आदी विषयांवर भाष्य केले. एवढेच नाही, तर देशात तयार होणाऱ्याच वस्तूच वापराव्यात, असा संकल्प देशवासीयांनी करावा, असे आवाहनही मोदींनी यावेळी केले. याच बरोबर मोदींनी कश्मिरी केशर, अकबराचा दरबार, गुरु गोविंद सिंह आणि गुरु तेग बहादूर यांचाही उल्लेख केला.

मोदी म्हणाले, देशवासीयांनी नव्या वर्षानिमित्त देशात तयार होणाऱ्या वस्तूच खरेदी करण्याचा संकल्प करावा. व्होकल फॉर लोकल हा स्वर आता घरा घरात घुमत आहे. त्यामुळे, आपल्या वस्तू जागतिक स्तरावरील असाव्यात हे, आपल्याला निश्चित करायचे आहे. जागतिक स्तरावर जे बेस्ट आहे, ते आपण भारतात तयार करून दाखवू. यासाठी आपल्या उद्योजक सहकाऱ्यांना पुढे यावे लागणार आहे. स्टार्टअपप्सनाही पुढे यावे लागणार आहे.

कोरोनामुळे जगातील सप्लाय चेनमध्येही अनेक अडथळे आले. मात्र, प्रत्येक संकटापासून आपण नवा धडा घेतला. देशात नवे सामर्थ्यही निर्माण झाले.

मोदी म्हणाले, मी आपल्याला आग्रह करतो, की आपण एक यादी बनवावी. दिवसभर आपण ज्या गोष्टी वापरतो. त्यामध्ये नकळतपणे विदेशात तयार होणाऱ्या वस्तू तर घेत नाही ना? यासाठी त्या वस्तूची भारतात तयार झालेल्या पर्यायी वस्तूची माहिती घ्या. आणि भारतीयांच्या कष्टाने तयार झालेल्या वस्तू वापरण्याचा संकल्प करा.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकबराच्या दरबारातील अबुल फजल यांच्या नावाचाही उल्लेख केला आणि एक वाक्याही सांगितले.

कश्मिरी केशर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. केशर काश्मीरचे एक वेगळेपण आहे. या केशरची गुनवत्ता अत्यंत चांगली आहे.

आज गुरु गोविंद सिंहांच्या आईचा हुतात्मा दिन आहे. काही दिवसांपूर्वी मी गुरु तेग बहादूर यांच्या दरबारात माथा टेकवला होता.

भारताने 2014-2018दरम्यान बिबट्यांच्या संख्येत 60% वृद्धी झाल्याचे पाहिले आहे. 2014 मध्ये, भारतात बिबट्यांची संख्या 7,900 गोती. ती 2019 मध्ये 12,852 झाली. विशेषत: मध्यभारतात यांची संख्या वाढली आहे.

मोदी म्हणाले, मला अनेक देशवासियांचे पत्र मिळाले आहेत. अधिकांश पत्रांत लोकांनी देशाचे सामर्थ्य आणि देशवासियांच्या एक्याच्या शक्तीचे कौतुक केले आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशानं करोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली, हेदेखील लोकांनी लक्षात ठेवले आहे,” असं मोदी म्हणाले.

मी नव्या वर्षासाठी तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा देतो. आता पुढील वर्षी जानेवारीमध्ये मन की बात होईल, असेही मोदी म्हणाले.