केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी डबल धमाका; नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 10:03 PM2021-11-19T22:03:10+5:302021-11-19T22:13:02+5:30

Farms Law Repeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कृषी कायदे रद्द करत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

मागील वर्षभरापासून केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी कायद्यावरुन शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांनी प्रचंड मोठं आंदोलन उभं केले होते. या आंदोलनात पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

अखेर वर्षभरापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठं यश आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु नानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर देशभरात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातवरण पसरलं आहे.

केंद्र सरकारकडून कृषी कायदे परत घेण्याची घोषणा झाली. त्यानंतर आता आगामी संसदीय अधिवेशनात याबाबत कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यानंतर कृषी विधेयकाबाबत केंद्र सरकारकडून एका कमिटीचं गठन करण्यात येईल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

कृषी विधेयक मागे घेतल्यानंतर आता केंद्र सरकार शेतकऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना(PM Kisan Samman Nidhi) योजनेतंर्गत केंद्राकडून शेतकऱ्यांना देण्यात येत असलेले पैसे दुप्पट होऊ शकतात.

रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. मोदी सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम दुप्पट करण्याचा विचार करत आहे. जर असं झाल्यास शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार ऐवजी १२ हजार रुपये तीन टप्प्यात वाटत केले जातील.

बिहारचे कृषी मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी अलीकडेच दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत मिळणारी रक्कम दुप्पट करण्याबाबत चर्चा झाली. परंतु अद्याप यावर कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.

जर तुम्हीही PM Kisan योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले असेल तर योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे की नाही चेक करावं लागेल. सर्वात आधी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर https://pmkisan.gov.in यावर क्लिक करावं लागेल.

या होमपेजवर तुम्हाला Farmers Corners चा पर्याय दिसेल. Farmers Corners मध्ये Beneficiaries List मध्ये क्लिक करुन तुम्हाला राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर गेट रिपोर्ट वर क्लिक करून तुम्हाला लाभार्थ्यांची यादी पाहावी लागेल.

आज गुरुनानक जयंती आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन सोडून आपल्या घरी परतावं. शेतात जावं. पुन्हा नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं. मोदींनी गुरुनानक जयंतीच्या दिवशीच तीन कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. आंदोलकांमध्ये शीख बांधवांची संख्या लक्षणीय असल्यानंच हा निर्णय घेतला गेल्याचं बोललं जातं.

कृषी कायदे रद्द करत भाजपनं राजकीय वापसी केल्याचं बोललं जात आहे. पंजाबमध्ये भाजपनं शिरोमणी अकाली दलासोबत निवडणुका लढवल्या. आतापर्यंत एकाही विधानसभा निवडणुकीत भाजपचे २० हून अधिक उमेदवार विजयी झालेले नाहीत. आता कृषी कायदे रद्द केल्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न भाजप करेल.