बॉर्डर सील, खिळे लावले, काटेरी तारांचे कुंपण, सिमेंटचे कठडे; शेतकऱ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 11:01 AM2024-02-13T11:01:59+5:302024-02-13T11:10:43+5:30

शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो मोर्चामुळे राजधानी दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या असून पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो मोर्चामुळे राजधानी दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या असून पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी दिल्लीच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर थांबवण्यासाठी रस्त्यावर खिळे, काटेरी तारांचे कुंपण, सिमेंटचे कठडे टाकण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्र्यांसोबत शेतकरी संघटनांची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकऱ्यांचा गट दिल्लीकडे कूच करत आहे. सरकार त्यांना सर्व प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे पण शेतकरी नेते त्यांच्या अटींवरून मागे हटायला तयार नाहीत.

शेतकरी नेत्यांनी आंदोलनाच्या घोषणेनंतर गाझीपूर, सिंघू, शंभू, टिकरीसह सर्व सीमा छावण्यांमध्ये बदलल्या आहेत. जर कोणी कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सरकारशी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी ट्रॅक्टर घेऊन शंभू सीमेवर पोहोचू लागले. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत दिल्ली चलो मोर्चा सुरूच ठेवणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकरी संघटना एमएसपी हमीभावाच्या मागणीसाठी आंदोलनावर ठाम आहेत. याशिवाय स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी शेतकरी संघटना करत आहेत. मागील आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हेही रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटना करत आहेत.

या प्रश्नांवर केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी शेतकरी संघटनांशी पाच तास चर्चा केली पण ती निष्फळ ठरली. या बैठकीला केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि अर्जुन मुंडा उपस्थित होते. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीवर कायदेशीर हमी हवी होती, यावर चर्चा निष्फळ ठरली.

यानंतर शेतकरी नेत्यांनी आंदोलनाची घोषणा करत दिल्लीकडे कूच करणार असल्याचे सांगितले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्लीला लागून असलेल्या सर्व सीमांवर रॅपिड ॲक्शन फोर्स आणि दिल्ली पोलिसांचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत.

शेतकरी संघटनांनी आज पुकारलेल्या 'दिल्ली चलो' निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. गाझीपूर सीमेवर वाहतूक मंदावली असून बॅरिकेडिंगमुळे लोकांना त्रास होत आहे. गाझीपूरमधूनही काही फोटो समोर आले आहेत यात मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याचे दिसून आले आहे.