१५ ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्याची केंद्राची परवानगी; जाणून घ्या, महाराष्ट्रात कधी सुरु होणार?
By प्रविण मरगळे | Updated: October 5, 2020 17:01 IST2020-10-05T16:58:37+5:302020-10-05T17:01:38+5:30

केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक -५ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार १५ ऑक्टोबरपासून भारतातील शाळा पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र कोरोनामधील परिस्थितीच्या आधारे केंद्र सरकारने शाळा सुरू करण्याचा किंवा न उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने सोडला आहे.

आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, दिल्लीसह अनेक राज्य सरकारांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्यात उत्तराखंड आपला निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे

उत्तर प्रदेशमधील अनलॉक ५ मार्गदर्शक सूचनांनुसार १५ ऑक्टोबरपासून शाळा आणि कोचिंग क्लासेस सुरू करता येतील परंतु त्यासाठी प्रशासनाची मान्यता घेणे आवश्यक असेल. विद्यार्थ्यांना पालकांच्या लेखी संमतीनंतरच शाळेत उपस्थित राहता येईल.

ज्या शाळा उघडण्यास परवानगी दिली जाईल त्यांना शिक्षण विभागाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल असं योगी सरकारने सांगितले आहे.

कोरोना संसर्ग लक्षात घेता सध्या महाराष्ट्रासह दिल्लीतील सर्व शाळा ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील. मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल म्हणाले की, पालक म्हणून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजते. यावेळी मुलांच्या आरोग्यासंदर्भात कोणतीही जोखीम घेणे योग्य होणार नाही.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, शिक्षण विभागाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ३१ ऑक्टोबरपर्यंत दिल्लीतील सर्व निर्बंध कायम राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राजधानी दिल्ली येथे सध्या शाळा सुरू होणार नाहीत. यापूर्वी, दिल्ली सरकारच्या अरविंद केजरीवाल सरकारने १८ सप्टेंबर रोजी आदेश जारी केला होता.

या आदेशात शाळा ५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यास सांगण्यात आले. दिल्ली सरकारने आता शाळांना दिलेल्या या आदेशाला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

केंद्राने शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे, पण कोविडशी संबंधित सर्व नियम व खबरदारीचे पालन करावे लागेल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया जारी केली आहे. यावर आधारित विविध राज्य सरकारे त्यांचे स्वतःचे नियम जारी करतील ज्याचे पालन शाळांना करावे लागेल.

लॉकडाऊन लागू झाल्यापासून राज्यातील शाळा-कॉलेज बंद आहेत. परंतु केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे दिवाळीनंतर महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याची तयारी राज्य सरकार करत आहे, नववी ते बारावीचे वर्ग सुरु होतील अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकार धोरण आखत आहे, सध्या पहिली ते आठवी शाळा कधीपर्यंत सुरु होतील याची स्पष्टता नाही, कोरोनाचा प्रार्दुभाव होणार नाही याची काळजी घेत शाळा सुरु होतील असं बच्चू कडूंनी सांगितले आहे.

















