हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:49 IST
1 / 10पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर पलटवार करण्याचा प्रयत्न केला पण भारताने पाकचे सर्व हल्ले परतावून लावले.2 / 10भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देत पाकिस्तानातील हवाई दलाचे एअरबेस उद्ध्वस्त केले. या घटनेनंतर दोन्ही देशातील तणाव वाढला होता. त्यात आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी पहिल्यांदाच भारताने २ मोठे एअरबेस नूर खान आणि शोरकोटवर हल्ला केल्याची कबुली दिली आहे. 3 / 10डार यांनी जियो न्यूजवर मुलाखत देत म्हटले की, ६-७ मे च्या रात्री पाकिस्तान प्रत्युत्तर देण्याची तयारी करत होते, तेव्हा भारताने पुन्हा स्ट्राईक करत नूरखान-शोरकोट एअरबेसला टार्गेट केले. याआधी पाकिस्तानी सरकार आणि सैन्याने भारताने हल्ला केल्याचे फेटाळले होते. परंतु काही काळाने पंतप्रधान शहबाज शरीफ आणि आता उपपंतप्रधान इशाक डार यांनी हल्ल्याची पुष्टी केली आहे.4 / 10याशिवाय इशाक डार यांनी भारत-पाकिस्तान युद्धविराममागे सौदी प्रिन्सने पुढाकार घेतल्याचे म्हटले. ६-७ मे रोजी हल्ल्यानंतर ४५ मिनिटांनी सौदी प्रिन्सने फोन करून भारतासोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला, त्यावर आम्ही हो बोलल्याने त्यांनी भारताशी चर्चा केली होती. 5 / 10इशाक डार यांनी केले २ खुलासे - भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांनी सैन्याला तयार राहण्याचे आदेश दिले होते. सर्वकाही ठरले होते आम्हाला काय करायचे ते...आम्ही पहाटे ४ वाजता भारतावर मोठा हल्ला करणार होतो, परंतु त्याआधीच भारताने रात्री अडीच वाजता पुन्हा स्ट्राइक केले. 6 / 10पाकिस्तानने हल्ला करण्याआधीच भारताने पाकिस्तानवर हल्ला केला. त्यात नूर खान, शोरकोट एअरबेससह अनेक ठिकाणांवर हल्ले केले होते. भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केला तेव्हा सौदी प्रिन्सने फोनवरून भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी बोलतो, पाकिस्तान युद्धविरामसाठी तयार असेल तर ते पण थांबतील. तेव्हा आम्ही होकार दिल्यानंतर त्यांनी भारताशी चर्चा करून पुन्हा फोन केला असं इशाक डार यांनी म्हटलं.7 / 10सौदीचे प्रिन्स फैसल बिन सलमान यांनी या देशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानकडून भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी संवाद साधला. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात संघर्ष कमी करण्यासाठी सौदीने महत्त्वाची भूमिका निभावली हे समोर आले. 8 / 10याआधीही पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एका मुलाखतीत भारताने ब्रह्मोस मिसाईलद्वारे रावलपिंडी एअरपोर्टसह अन्य ठिकाणांवर हल्ला केल्याचे कबूल केले होते. पाकिस्तानने प्रत्युत्तरासाठी १० मे पहाटे ४.३० वाजता हल्ल्याची तयारी केली होती परंतु भारताने दुसरा स्ट्राईक करून पाकचा डाव हाणून पाडला. 9 / 10पाकिस्तानातील बंदर कराचीपासून १५० किमी दूर भोलारी एअरबेसवर भारताने टार्गेट केले होते. इथला अचूक हल्ला विमान हँगरवर होता. सॅटेलाईट फोटोद्वारेही भारताने केलेल्या हल्ल्याचे फोटो पुढे आले होते. त्यात भोलारी एअरबेसवर झालेल्या हल्ल्यात प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आले.10 / 10विशेष म्हणजे पाकिस्तानी सैन्य मुख्यालय आणि पंतप्रधान कार्यालयापासून अवघ्या २५ किमी अंतरावरील नूर खान एअरबेसलाही भारताने टार्गेट केले. या ठिकाणापासून अण्वस्त्रे स्टोरेज फॅसिलिटी आणि सिक्युरिटी काहीच अंतरावर होती. त्यामुळे भारतीय सैन्याद्वारे अतिशय संवेदनशील परिसरात हा हल्ला यशस्वीपणे घडवून आणला होता.