Navratri 2022: नवरात्रीत अखंड दिवा लावणार असाल तर जाणून घ्या हे महत्त्वाचे नियम!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 03:52 PM2022-09-14T15:52:31+5:302022-09-14T15:58:37+5:30

Navratri 2022: हिंदू धर्मात वर्षातून ४ वेळा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यामध्ये २ वेळा गुप्त नवरात्र आणि २ वेळा प्रकट नवरात्र साजरी केली जाते. अश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षातील प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते.

ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. २६ सप्टेंबरपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव ४ ऑक्टोबर पर्यंत साजरा केला जाईल आणि ५ ऑक्टोबर रोजी विजय दशमीला दुर्गा विसर्जनाने त्याची सांगता होईल. या नऊ दिवसांत भाविक विविध प्रकारे देवीची उपासना करतात. या उपासनेचा एक भाग म्हणून नऊ दिवस सातत्याने दिवा तेवत ठेवला जातो. या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनासोबतच अखंड ज्योतीही प्रज्वलित केली जाते. मात्र केवळ दिवा तेवत ठेवून भागणार नाही, तर त्याच्याशी संबंधित गोष्टींचीही काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

अखंड ज्योती म्हणजे जी खंडित होत नाही किंवा अविरत जळत राहते. नवरात्रीत जागरणही केले जाते. अखंड तेवणारा दिवा हे जागृतीचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवली जाते, तशी आपली आत्मज्योत सदैव तेवत राहावी आणि आपण सदैव जागृत राहावे, याची जाणीव करून देण्यासाठी नवरात्रीत नऊ दिवस दिवा अखंड तेवत ठेवला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार अखंड ज्योती हे अखंड श्रद्धेचे प्रतीक आहे. अशा वेळी देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यदाकदाचित ज्योत मालवली, तर छोट्या निरांजनाने पुन्हा ज्योत प्रज्ज्वलित करा.

असे मानले जाते की दिव्यासमोर मंत्राचा जप केल्याने हजारो पटींनी अधिक पुण्य प्राप्त होते. दिव्याच्या मंद प्रकाशात देवीसमोर बसून ध्यानधारणा केल्यास मन लवकर एकाग्र होते.

अखंड ज्योती अशा ठिकाणी ठेवावी, जिथे वारा कमी असेल. त्यामुळे दिवा विझण्याची भीती राहणार नाही.

घरात अखंड ज्योत तेवत असेपर्यंत घरातील वातावरण शांत असावे. भांडण टाळावे. शाकाहार करावा. ब्रह्मचर्य पाळावे.

घरात अखंड ज्योती तेवत ठेवणार असाल तर ९ दिवस घरा दाराला कुलूप लावू नये. घरात एखादा तरी सदस्य असू द्यावा.