Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:18 IST
1 / 6नागाचा संदर्भ आपल्या धर्मग्रंथात अनेक ठिकाणी आलेला आहे. श्रीविष्णू हे शेष नागाची शय्या करून त्यावर आसनस्थ झाले आहेत. देव दानवांनी केलेल्या समुद्र मठनात वासुकी नावाचा दोरासारखा उपयोग करण्यात आला होता. नागलोक नावाची एक अद्भुत सृष्टी पाताळात आहे, असा धार्मिक कथांमधून उल्लेख आढळतो व त्या ठिकाणी नागदेवता राहतात असेही सांगितले जाते. माणसाच्या ठायी जी कुंडलिनी शक्ती आहे ती मणक्याच्या खाली सर्पकृती वेटोळे घालून बसलेली असते. 2 / 6श्रीशंकराने आपल्या गळ्यातच नागाला धारण केले आहे. भगवान श्रीकृष्णाने लहानपणी यमुना नदीतील कालिया नावाच्या विषारी नागाला लोळवून गोकुळास भयमुक्त केले होते, अशी कथा आहे. हा कालिया मर्दनाचा प्रसंग श्रावण शुद्ध पंचमीला घडला होता असेही सांगितले जाते. या धारणेला अनुसरून नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो.3 / 6ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नाग किंवा साप हे खूप उपयुक्त ठरतात. शेतीचा नाश करणाऱ्या प्राण्यांना ते खाऊन टाकतात. त्यामुळे शेताचे आणि पिकांचे रक्षण होते. नागाला म्हणूनच क्षेत्रपाल म्हणून संबोधले जाते. म्हणूनच की काय, सुवासिनी त्याची भाऊ अर्थात रक्षणकर्ता म्हणून पूजा करतात. पुढे ही प्रथा भावाच्या रक्षणासाठी उपास करावा यादृष्टीने सुरु झाली. सण-उत्सव म्हटल्यावर ओघाने नटणे-मुरडणे आले. त्यामुळे स्त्रिया आदल्या दिवशी मेहेंदी लावून दुसऱ्या दिवशी नागदेवतेची पूजा करत असत. 4 / 6दूध, कानोले/ पुरणाची दिंड, नागाची मूर्ती, हळद, कुंकू, अक्षता, फुलं, दुर्वा, १उदबत्ती, काडेपेटी, ज्वारीच्या लाह्या, ज्वारीचे पीठ, कापसाची वस्त्रमाळ, दिवा. 5 / 6नागपंचमीच्या दिवशी मुख्यत: स्त्रिया नागाची पूजा करतात. जिवंत नागाऐवजी अलिकडे कागदावर किंवा पाटावर नऊ नागाचे चित्र रांगोळीने रेखाटून गंध, फुले वाहून त्याची पूजा करतात. काही ठिकाणी मातीच्या नागांची पूजा केली जाते. दूध-लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. गोडाचा पदार्थ म्हणून काही ठिकाणी पुरणपोळी, तर काही ठिकाणी दिंड/ कानोले केले जातात आणि तेच नैवेद्यात ठेवले जातात. धूप दीप ओवाळून पूजा केली जाते. 6 / 6या दिवशी सर्पाकृती भाज्या भक्षण न करण्याची प्रथा आहे. तसेच विळी, चाकू, सुरी, तवा या साधनांचा उपयोग न करता अन्न केवळ शिजवून खाण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष वारुळाची पूजा केली जाते. पण ते ग्रामीण भागातच शक्य आहे. नागपूजेने नागदंशाचे भय नष्ट होते असे म्हणतात. नागपंचमीच्या दिवशी नाग कुणालाही दंश करत नाहीत, हा मोठा चमत्कारच म्हटला पाहिजे. जीवसृष्टीचे रक्षण हा त्यामागील हेतू आहे हे लक्षात घेऊन नागपंचमीची पूजा ही पर्यावरणाची पूजा आहे आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प आहे असे म्हणता येईल.