तुमच्या 'या' सवयींमुळे नशीब कधीच साथ देत नाही अन् बसते प्रगतीला खीळ; सतर्क व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 04:03 PM2022-02-08T16:03:59+5:302022-02-08T16:21:00+5:30

माणसाच्या सवयींचा त्याच्या वैयक्तिगत आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. चांगल्या सवयी माणसाला यशस्वी बनवतात तर वाईट सवयींमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशाच काही चुकीच्या सवयींबाबत आपण जाणून घेणार आहोत.

प्रत्येक व्यक्तीच्या त्याच्या त्याच्या काही सवयी असतात. चांगल्या सवयींमुळे सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. तर वाईट सवयींममुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. पंडीत शैलेंद्र पांडे यांच्यानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्म कुंडलीमध्ये ज्या ग्रहांचा कमी-अधिक प्रमाणात प्रभाव असतो त्याचपद्धतीनं त्याच्यातील चांगल्या व वाईट सवयींचा प्रभाव पाहायला मिळतो.

ज्या ग्रहाचा प्रभाव चांगला असतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये चांगल्या सवयींचा देखील प्रभाव दिसू लागतो. पण ज्या ग्रहांचा परिणाम वाईट ठरताना दिसतो तेव्हा त्या व्यक्तीला काही वाईट सवयी जडलेल्या दिसून येतात. म्हणजेच आपल्या सवयींनुसार ग्रहांचा प्रभाव देखील कमकुवत किंवा प्रभावशाली ठरत असतो. वाईट किंवा चुकीच्या सवयींमुळे अनेकदा व्यक्तीचे मजबूत ग्रह देखील वाईट होऊ लागतात.

सवयींचा आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळेच त्या वाईट किंवा चुकीच्या सवयींचा प्रभाव तुमच्यावर झाला आहे अशा सवयी तात्काळ बंद करायला हव्यात. जेणेकरुन चांगला ग्रहकाळ सुरू होईल आणि दैनंदिन पातळीवर तुम्हाला फायदा व सुख-समृद्धी प्राप्त होऊ शकेल.

बसल्या बसल्या तुम्हाला तर पाय हलवत राहण्याची सवय असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या मनात एखादी गोष्ट घिरट्या घालत आहे. एखाद्या विषयाचा तुम्ही वारंवार विचार करत असल्याचं ते लक्षण मानलं जातं. अशी सवय असल्यास कुंडलीतील चंद्रमा कमजोर असल्याचं मानलं जातं. सतत पाय हलवत बसणारे व्यक्ती मानसिकरित्या खूप कमकुवत असल्याचं लक्षण आहे आणि अशा व्यक्तींना तणाव सहन करता येत नाही.

अनेकांना नखं कुरतडण्याची सवय असते. नखं कुरतडण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींच्या राशीत सूर्य कमकुवत असल्याचं मानलं जातं आणि अशा व्यक्तींना डोळ्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. जर या सवयीवर मात केली तर व्यक्तीचा समाजातील मान-सन्मान वाढण्यास सुरुवात होते आणि आरोग्य देखील सुधारते.

ज्या व्यक्ती चपला, बुटं, कपडे, घर आणि पुस्तकं अस्ताव्यस्त ठेवतात. गोष्टी जागच्या जागी किंवा नीटनेटक्या ठेवत नाहीत अशा व्यक्तींचा शनी खूप कमकुवत असल्याचं मानलं जातं. अशा व्यक्तींना रोजगाराच्या बाबतीत खूप उतार-चढावा अनुभवावे लागतात. तसंच अशी सवय असलेल्या व्यक्तींच्या घरात अनेकदा चोरीच्या घटना देखील होतात. ही सवय सोडल्यास रोजगारात स्थिरता प्राप्त होईल. त्यामुळे आयुष्यात नीटनेटकेपणा आणि वस्तू अस्ताव्यस्त टाकण्याची सवय बंद केल्यास करिअर खूप चांगलं होईल. तसंच घरातील लहान मुलांचा खोडसाळपणा देखील कमी होतो.

ज्या व्यक्ती त्यांचं बेडरुम आणि बाथरुम स्वच्छ ठेवत नाहीत अशा व्यक्तींचा शुक्र ग्रह खूप कमकुवत असल्याचं मानलं जातं. अशा व्यक्तींना त्यांनी केलेल्या कामात कधीच यश प्राप्त होत नाही. तसंच घराती सदस्य नेहमी मानसिक तणावात राहतात.

जेवण झाल्यानंतर खरखटी भांडी ताबडतोबत न धुता ती तशीच ठेवून देण्याची अनेकांना सवय असते किंवा ती दुसऱ्या दिवशी सकाळी धुतली जातात. पण असं करणं चांगली सवय नाही. असं केल्यामुळे चंद्रमा आणि शनी ग्रहाची वक्र दृष्टी पडते असं म्हटलं जातं. यामुळे घरात येणाऱ्या यशाला मर्यादा येते.

अनेकांना कुठेही थुंकण्याची वाईट सवय असते. असं केल्यामुळे कुंडलीतील शनी कमजोर होतो. त्यामुळे ही वाईट सवय जितकं लवकर होईल तितकं लवकर सोडणं खूप फायदेशीर ठरेल.