फेरफाराची प्रतीक्षा; शेतकऱ्याचा मृत्यू,सहा वर्षांनंतरही फेरफार अर्ज प्रलंबितच; असंवेदनशील कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 06:19 AM2021-03-29T06:19:34+5:302021-03-29T06:19:59+5:30
शेत जमीनीचा फेरफार अर्ज तलाठी यांच्याकडे देणे व तो अर्ज मंजूर होणे हे तसे सोपे काम; परंतु, तालुक्यातील कोथाळा येथील कै. नागोराव गोरे यांनी फेरफार अर्ज दाखल केल्यानंतर तब्बल पाच वर्षे उलटली.
- सत्यशील धबडगे
मानवत (जि. परभणी) : शेत जमीनीचा फेरफार अर्ज तलाठी यांच्याकडे देणे व तो अर्ज मंजूर होणे हे तसे सोपे काम; परंतु, तालुक्यातील कोथाळा येथील कै. नागोराव गोरे यांनी फेरफार अर्ज दाखल केल्यानंतर तब्बल पाच वर्षे उलटली. या पाच वर्षात प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून त्यांची प्राणज्योत मावळली तरी देखील तो फेरफार अर्ज अजूनही मंजूर झालेला नाही.
तालुक्यातील कोथाळा येथे नागोराव गोरे यांची व त्यांचे इतर दोन मयत बंधू कुंडलिक गोरे व संतराम गोरे यांच्यात सामायिकरित्या ५ हेक्टर ४४ आर शेतजमीन आहे. कुंडलिक गोरे व संतराम गोरे यांचे निधन झाल्यानंतर नागोराव गोरे हेच वारस असल्याने त्यांना कायदेशीररित्या वारस प्रमाणपत्र मिळाले. त्यानंतर त्यांनी तलाठी उज्ज्वल तंवर यांच्याकडे २३ ऑगस्ट २०१६ रोजी फेरफार अर्ज दाखल केला.
तहसीलदार यांनी नागोराव गोरे यांच्या अधिकारात २ मे २०१७ रोजी कार्यालय आदेश काढून फेर घेण्याबाबत तलाठी यांना निर्देशित केले. तरी देखील तलाठी यांनी फेर घेतलाच नाही. कंटाळून नागोराव गोरे यांनी उपविभागीय अधिकारी, पाथरी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला. यावर कायदेशीर प्रक्रिया पार पाडून उपविभागीय अधिकारी पाथरी यांनी ३१ नोव्हेंबर २०१७ रोजी नागोराव गोरे यांच्या बाजूने आदेश पारित करुन तलाठी यांना फेर घेण्यास सांगितले. तरी देखील तलाठी उज्ज्वल तंवर व मंडळ अधिकारी योगेंद्र नांदापूरकर यांनी वरिष्ठाच्या आदेशाचा अवमान करुन फेर घेतलाच नाही.
हे सर्व घडत असताना प्रशासकीय कार्यवाहीला कंटाळलेल्या नागोराव गोरे यांचा २० जुलै २०२० रोजी मृत्यू झाला. जिंवत असताना प्रशासकीय यंत्रणेच्या आडकाठी धोरणामुळे या शेतकऱ्याचा फेर ओढला गेलाच नाही नाही.