परभणीत कापूस खरेदीसाठी प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:30 IST2020-12-03T04:30:24+5:302020-12-03T04:30:24+5:30
अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांचे धाडसत्र परभणी : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मागील ...

परभणीत कापूस खरेदीसाठी प्रतीक्षाच
अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांचे धाडसत्र
परभणी : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मागील १५ दिवसांपासून धाड सत्र सुरू केले आहे. ८ दिवसांत जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कारवाया केल्या जात आहेत. यातून मोठ्या प्रमाणात देशी दारू, गुटखा यासह इतर मुद्देमाल जप्त केला जात आहे. या कारवायांमुळे वाळू, गुटखा, देशी दारू माफियांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे.
निधी उपलब्ध करून देण्याची मागणी
परभणी : येथील बसपोर्टसाठी १३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. विशेष म्हणजे या बसपोर्टचे काम सुरूही आहे. मात्र, कंत्राटदारांकडून बिलापोटी एसटी महामंडळाकडे ६० लाख रुपयांचे बिल पाठविले आहे. परंतु, हे बिल एसटी महामंडळाने अद्यापपर्यंत दिलेले नाही. त्यामुळे परभणीकरांचे स्वप्न असलेल्या बसपोर्टचे काम बंद पडले आहे. याकडे लक्ष देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
९९३ रुग्णांना रक्त पुरवठा
परभणी : जिल्ह्यामध्ये जीवन अमृत सेवा म्हणजेच ब्लड ऑन कॉल या योजनेंतर्गत १ जानेवारी ते ऑक्टोबर २०२० या दहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ९९३ रुग्णांना ४० किमी अंतरापर्यंत रक्त पिशव्या पोहचविल्या आहेत. यामध्ये जानेवारी ११६, फेब्रुवारी ११८, मार्च १२८, एप्रिल ९२, मे ९८, जून ९५ व जुलैत ९६ बॅगा रक्त पुरवठा करण्यात आला आहे.
३०२ कोटी थकले
परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन काळात सरासरीवर आधारित दिलेल्या बिलांपैकी ३ लाख ३७ हजार ६३ ग्राहकांकडे ३०२ कोटी ६३ लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. ही बिले वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे थकबाकी वाढत आहे.
केवळ ७२५ घरे पूर्ण
परभणी : रमाई आवास योजनेंतर्गत शहरी नगरपालिका व महानगरपालिकेंतर्गत २०१६ ते २०२० या ५ वर्षांत ३ हजार ३५७ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी केवळ ७२५ घरकुले पूर्ण झाली आहेत. अद्यापही २ हजार ६३२ घरकुले अपूर्ण आहेत. त्यामुळे प्रशासनाने गती वाढविणे गरजेचे आहे.
सरसकट पीक विमा द्या
परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत आपली पिके संरक्षित केली. मात्र, नुकसान होऊनही अद्याप या शेतकऱ्यांना कोणतीही रक्कम विमा कंपनीकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे शासकीय मदत मिळाली असतानाही विमा कंपनीने मदत द्यावी.