रोडरोमियोंचा त्रास वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:02 IST2021-02-05T06:02:51+5:302021-02-05T06:02:51+5:30
शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागासह पाथरी तालुक्यातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी मानवत शहरात येतात. यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. ...

रोडरोमियोंचा त्रास वाढला
शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागासह पाथरी तालुक्यातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी मानवत शहरात येतात. यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. शाळा महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थिनी बसची वाट बघत बस स्थानक परिसरात बसत असतात. हिच संधी साधत रोडरोमियो मुली ज्या ठिकाणी थांबलेल्या असतात, त्या ठिकाणी चकरा मारणे, दुचाकीवरून विनाकारण हॉर्न वाजवित जाणे, मुलींना पाहून शेरेबाजी करणे असे प्रकार सर्रासपणे करतात. यातील काही जण शहरातून धूमस्टाईलने दुचाकी पळवून दुचाकीचे कर्कश हॉर्न वाजवित विविध आवाज काढतात. यामुळे अनेक छोटे-मोठे आपघात घडल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शाळा, महाविद्यालय, पोलीस प्रशासन, खासगी शिकवणीवाले यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, जेणेकरून रोडरोमियोंवर कारवाई करणे सोपे जाईल. दुसरीकडे पोलीस प्रशानानाही चिडीमार पथक स्थापन करून रोडरोमियोंना चाप बसविण्याची मागणी पालकांतून होत आहे.
वळण रस्त्यावर अल्पवयीन मुले सुसाट
शहरातील वळण रस्त्यावर दोन महाविद्यालये, एक शाळा आणि खासगी कोचिंग क्लासेस आहेत. महाराणा प्रताप चौक ते मलिकार्जुन मंदिरापर्यंत असलेल्या पुलाशेजारी रस्त्यावर विद्यार्थ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. मुली याच रस्त्याने शाळा महाविद्यालयात येत असतात. या रस्त्यावरून अल्पवयीन मुले मोटारसायकल सुसाट पळवितानाचे चित्र आहे. पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेऊन पालकांशी संपर्क करून समज देणे गरजेचे झाले आहे. टवाळखोर मुलांबाबत समोर येऊन तक्रार करायला मुली घाबरतात. त्यामुळे शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात तक्रारपेट्या बसविण्यात याव्यात. या पेट्या नियमित उघडण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे.
या भागात सीसीटीव्हीची गरज
मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरपालिकेने पुढाकार घेऊन शहरातील मुलींची वर्दळ असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविल्यास अशा घटनाना आळा घालणे सोपे जाईल. शहरातील बस स्थानक, महाराणा प्रताप चौक, आठवडे बाजार रस्ता, गोलाईत नगर रस्ता, पोलीस क्वार्टर रस्ता, पाळोदी रस्ता, केंद्रीय प्राथिक शाळा या परिसरात सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे, तसेच वळण रस्त्यावर असलेल्या शाळा, महाविद्यालय प्रशासनाने प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही बसविल्यास शाळा, महाविद्यालयाच्या बाहेरील टवाळखोरांवर वॉच ठेवणे सोपे जाईल.