९०० कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपचारांची भिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:18 IST2021-04-23T04:18:44+5:302021-04-23T04:18:44+5:30
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ९०९ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायम ...

९०० कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपचारांची भिस्त
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ९०९ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायम कर्मचाऱ्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा हातभार लागत असल्याने रुग्णांवर उपचार करताना येणारा ताण काहीसा कमी झाला आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रुग्णालये कमी पडू लागली आहेत. त्याचबरोबर आता या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्मचाऱ्यांचाही तुटवडा जाणवत असल्याने जिल्हा प्रशासनाने कंत्राटी तत्वावर कर्मचारी नियुक्त केले आहेत. जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, अस्थिव्यंग रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय, ६ ग्रामीण रुग्णालय, ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र, ६ नव्याने तयार केलेले प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २१५ उपकेंद्र या शासकीय संस्था कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जात आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेड, ऑक्सिजन सिलिंडर आणि इतर भौतिक सुविधा वाढविण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. त्याचबरोबर या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कंत्राटी स्वरूपात कर्मचारी भरती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य कर्मचाऱ्यांची ५९९ पदे मंजूर आहेत; परंतु प्रत्यक्षात त्यापैकी ४८० पदांवर कर्मचारी कार्यरत असून, २१९ कर्मचारी सध्या रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने कंत्राटी स्वरूपात नवीन कर्मचारी घेणे क्रमप्राप्त होते. प्रशासनाने ही सुविधाही केली असून, मागील काही दिवसांपूर्वी कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण ९०९ कर्मचारी देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मदत होत असून, रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी फायदा होत आहे. जिल्ह्यात ५०० बेडची संख्या आणखी वाढविली जाणार असल्याने पुन्हा एकदा कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची भरती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रिक्त पदांमुळे ग्रामीण आरोग्य सेवेवर ताण
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदांचे प्रमाण मोठे आहे. ग्रामस्थांना आरोग्य सेवा पुरविताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे एक पद रिक्त आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ७, औषध निर्माण अधिकारी १४, एएचचे १८, एएनएमची १३४, एमपीडब्ल्यू ३९ असे एकूण २१९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कंत्राटी तत्वावर कर्मचारी नियुक्ती करण्याबरोबरच ही पदे भरण्यासाठी ही आरोग्य विभागाला पाठपुरावा करावा लागणार आहे
ग्रामीण भागात साडेसहा हजार रुग्ण
जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत एक लाख १ हजार ७१३ नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासणी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ६ हजार ५३५ पॉझिटिव्ह रुग्ण नोंद झाले आहेत. सर्वाधिक रुग्ण परभणी तालुक्यातील १ हजार ६११ एवढे आहेत. पूर्णा तालुक्यात १ हजार ६४ तर जिंतूर तालुक्यात १ हजार ७१ रुग्ण आहेत. परभणी, पूर्णा आणि जिंतूर वगळता इतर तालुक्यांमध्ये मात्र रुग्णांची संख्या १ हजार पेक्षा कमी आहे.