शेअर्स नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:13 IST2021-07-19T04:13:15+5:302021-07-19T04:13:15+5:30
तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी व पूर्णा या दोन्ही नद्यांच्या काठी असलेल्या २३ गावात उसाची मोठी लागवड करण्यात आली आहे. कृषी ...

शेअर्स नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत
तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी व पूर्णा या दोन्ही नद्यांच्या काठी असलेल्या २३ गावात उसाची मोठी लागवड करण्यात आली आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीवरून यंदा तालुक्यात उसाची लागवड वाढली असून, ७ हजार २९० हेक्टरवर नव्या उसाची लागवड झाली आहे. पूर्णा शहरालगत बळीराजा कारखाना झाल्याने पाणी असलेल्या भगात ऊसाची लागवड वाढत चालली आहे. खासगी कारखान्यांनी सुरुवातीला प्रत्येकाचा ऊस नेल्याने अल्पभूधारक शेतकरीही ऊस लागवडीकडे वळला. परंतु, मागील वर्षी हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखान्याने शेअर्स खरेदीची अट टाकली. बळीराजा कारखाना हा तालुक्यात असल्याने तो सोयीचा ठरणारा होता. धनदांडग्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेअर्स खरेदी केले. मात्र, आर्थिक अडचणीमुळे अल्प - भूधारक शेतकरी २५ हजारांचा शेअर्स खरेदी करू शकला नाही. यामुळे आता तो अडचणीत आला आहे. पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस नेण्यासाठी पर्याय नसल्याने आता आपला ऊस जातो की नाही, याची चिंता लागली आहे.
सोयाबीनचे क्षेत्र वाढले
कृषी विभागाच्या पेरणी अहवालानुसार यंदा तालुक्यात ६० हजार खरीप क्षेत्रापैकी ४६ हजार ५४८ हेक्टरची पेरणी झाली. दरवर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीन व उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. तालुक्यात पूर्णा, चुडावा, कातनेश्र्वर, ताडकळस, कावलगाव हे सहा कृषी मंडल आहेत. प्रामुख्याने खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात होते. यावर्षी मृग नक्षत्रात पेरण्या झाल्या. परंतु पावसाने अचानक दांडी मारल्याने त्या भगातील पिकांची पेरणी दुसऱ्यांदा करावी लागली. कडधान्य, तृणधान्य, गळीतधान्य व एकूण नगदी पिकांची पेरणी झाली आहे. त्यामधे तृणधान्य ३९७ हेक्टर, कडधान्य ३७६७, गळीत धान्य ३०५१३ हेक्टर आहे. यापैकी ३० हजार ४९३ हेक्टर पेरणी एकट्या सोयाबीन पिकाची आहे.