राष्ट्रवादी, भाजपत उमेदवारांची खांदेपालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:43 IST2021-01-13T04:43:02+5:302021-01-13T04:43:02+5:30
दलबदलू उमेदवारांचा दोन्ही पक्षांना फटका जिंतूर : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये फूट पडली असून, ...

राष्ट्रवादी, भाजपत उमेदवारांची खांदेपालट
दलबदलू उमेदवारांचा दोन्ही पक्षांना फटका
जिंतूर : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये फूट पडली असून, मागील वेळी एका पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आता मात्र दुसऱ्याच पक्षाकडून निवडणूक करीत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे
जिंतूर तालुक्यामध्ये १०१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. या निवडणुकीत अनेक उमेदवार हे आपला पक्ष सोडून इतर पक्षांच्या पॅनलमध्ये सामील झाले आहे. बोरीमध्ये राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे. मागच्या वेळेस राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले तीन सदस्य चक्क भाजपच्या पॅनलकडून निवडणूक लढवित आहेत. शेख शेरू शेख वाजिद,अनंतराव श्रीरंगराव चौधरी,भास्कर कनकुटे हे तिघे राष्ट्रवादीकडून मागच्या वेळेस ग्रामपंचायत सदस्य यावेळेस भाजपच्या पॅनलकडून निवडणूक लढवित आहेत. सावंगी माळसा ग्रामपंचायतीत बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक माजी सभापती सुंदरराव चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचे प्रमुख बनवून माजी आ. विजय भांबळे यांनी बोर्डीकर गटाला जोरदार धक्का दिला आहे, तर याच ठिकाणी भांबळे यांचे कट्टर समर्थक माजी जि.प. सदस्य विजयकुमार
वाकळे यांनी भाजपच्या पॅनलमध्ये समाविष्ट होऊन भांबळे यांना धक्का दिला आहे. चारठाणा येथेही दलबदलूची प्रचंड संख्या आहे. विजय भांबळे यांचे एकेकाळी कट्टर समर्थक असलेले नानासाहेब राऊत यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले आहे, तर एकेकाळी बोर्डीकर यांचे समर्थक असणारे माजी सरपंच बी. जी. चव्हाण हे आता राष्ट्रवादीचे पॅनल करून निवडणूक लढवित आहेत. याठिकाणी अनेकजण या पक्षातून त्या पक्षात जाऊन नशीब आजमावत आहेत.
काँग्रेसला मिळाले नाहीत उमेदवार
बोरी ग्रामपंचायतीमध्ये प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नागसेन भेरजे यांना पॅनलसाठी उमेदवार सुद्धा मिळाले नाहीत. केवळ दोन जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. शिवाय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप चव्हाण यांच्या भावजय दीपा संदीप चव्हाण या सावंगा म्हाळसा येथून भाजपच्या पॅनलकडून निवडणूक लढवित आहेत. तालुक्यामध्ये काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे.