प्रजासत्ताक दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST2021-02-05T06:07:09+5:302021-02-05T06:07:09+5:30
रेल्वे गाड्यांना वाढली प्रवासी संख्या परभणी : नांदेड - मनमाड या मार्गावर रेल्वे गाड्यांची संख्या वाढली असून, हळूहळू रेल्वेने ...

प्रजासत्ताक दिन उत्साहात
रेल्वे गाड्यांना वाढली प्रवासी संख्या
परभणी : नांदेड - मनमाड या मार्गावर रेल्वे गाड्यांची संख्या वाढली असून, हळूहळू रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढू लागली आहे. आरक्षण करुनच प्रवाशांना रेल्वेने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे स्थानकावर आरक्षण करण्यासाठी प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे. रेल्वे प्रशासनाने तिकीट खिडक्यांची संख्या वाढवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
ग्रामस्थांना विकासकामांची प्रतीक्षा
परभणी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील विकासकामे ठप्प होती. आता आचारसंहिता शिथील झाल्याने ग्रामस्थांना विकासकामांची प्रतीक्षा लागली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न बिकट झाला आहे. या कामासाठी निधी मंजूर करुन कामे सुरू करावीत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
जलकुंभ उभारणीचे काम अंतिम टप्प्यात
परभणी : येथील अमेय नगर भागात जलकुंभ उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जलकुंभावर स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, येत्या महिनाभरात जलकुंभाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सध्या येथील पाणीपुरवठा विस्कळीत आहे.
कचरा संकलनात मोठी वाढ
परभणी : शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत मनपाकडून घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन केले जात आहे. प्रभागांमध्ये दररोज दोनवेळा घंटागाडी फिरवली जात असून, सुमारे १३० टन कचरा दररोज संकलित केला जात आहे. त्यामुळे शहरातील कचऱ्याची समस्या बऱ्याच अंशी मिटली आहे.
वाळूचा अवैध उपसा सुरुच
परभणी : जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव अद्याप झाले नसून, नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केला जात आहे. महसूल प्रशासन आणि पोलीस अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत असले तरी अजूनही वाळू उपसा थांबलेला नाही. त्यामुळे अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यात वाढले ऊसाचे क्षेत्र
परभणी : जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला असून, शेतकऱ्यांनी ऊस लागवडीवर भर दिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असून, ग्रामीण भागात ऊस तोडणीला वेग आला आहे.