परभणी : बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:39 IST2019-04-27T23:38:45+5:302019-04-27T23:39:08+5:30
जिल्ह्यासह राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने व लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कृषी उत्पन्न व बाजार समित्यांच्या निवडणुका ३१ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

परभणी : बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: जिल्ह्यासह राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने व लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कृषी उत्पन्न व बाजार समित्यांच्या निवडणुका ३१ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीचा मराठवाड्यातील टप्पा पूर्ण झाला असला तरी मुंबईसह अन्य काही भागातील निवडणुका होणे बाकी आहे. तसेच राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. न्यायालयाने ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या बाजार समित्यांच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी किंवा जिल्हा उपनिबंधकांनी निवडणुकीची कार्यवाही सुरु केली आहे, अशा बाजार समित्या वगळून अन्य कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका नियत झाल्या आहेत, अशा निवडणुका ३१ मे पर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे आदेश नुकतेच सहकार विभागाने काढले आहेत.