- विठ्ठल भिसे पाथरी (परभणी ): पाथरी तालुक्यातील हदगाव बु येथे १३ मे रोजी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अखेर ३0 मे रोजी उपचारादारम्यान मृत्यू झाला. मात्र, अपघाताला तब्बल तीन आठवडा उलटल्यानंतरही संबंधित वाहनाचा आणि चालकाचा पोलिसांनी तपास लावलेला नाही. यामुळे संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणत निषेध नोंदविला.
१३ मे रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास हदगाव बु येथे एका अज्ञात वाहनाने शांताबाई बाबुराव जाधव (55) या महिलेला धडक दिली होती. या धडकेत महिला गंभीर जखमी झाली होती. गंभीर जखमी शांतबाई यांना प्रथम परभणी येथील आणि त्यानंतर नांदेडच्या रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, तिथे उपचार सुरू असतानाच ३0 मे रोजी तिचा मृत्यू झाला.
नातेवाईकांचा मृतदेहासह ठाण्यात ठिय्यामात्र, या अपघातानंतर तीन आठवड्याहून अधिक काळ उलटून गेला असतानाही पोलिसांना अद्याप वाहनाचा शोध लागला नाही. यामुळे संतप्त नातेवाईकांनी आज, 31 मी रोजी दुपारी नांदेड येथून महिलेचा मृतदेह थेट पाथरी पोलीस ठाण्यात आणला. वाहन व चालक यांचा शोध लागेपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. सुमारे काही तास पोलिस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत आठ दिवसांच्या आत वाहन व चालकाचा तपास घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले आणि मृतदेह अंत्यसंस्कारासाठी हलविण्यात आला.
विना क्रमांकाचा टेम्पो संशयितपोलिसांनी या घटनेचा तपास सुरू असल्याचे सांगितले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. तपासादरम्यान, एका फुटेजमध्ये कोंबड्या घेऊन जाणारा, नंबर प्लेट नसलेला टेम्पो दिसून आल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी दिली आहे. तोच अपघात करणारा वाहन असण्याची शक्यता व्यक्त होत असून, पोलिसांकडून त्या दिशेने तपास सुरू आहे.