OBC Reservation : भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने परभणीत चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 13:49 IST2021-06-26T13:49:03+5:302021-06-26T13:49:32+5:30
OBC Reservation: भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने ओबीसी समाजाच्या रद्द झालेल्या आरक्षणाचा प्रश्न चक्काजाम आंदोलनातून मांडण्यात आला.

OBC Reservation : भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने परभणीत चक्काजाम आंदोलन
परभणी : ओबीसी समाजाचे रद्द केलेले आरक्षण तत्काळ देण्यात यावे तसेच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने शहरातील महाराणा प्रताप चौक येथे २६ जून रोजी सकाळी १०.३० ते ११.१५ दरम्यान चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यानंतर आंदोलकांना नानलपेठ पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले व काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने ओबीसी समाजाच्या रद्द झालेल्या आरक्षणाचा प्रश्न चक्काजाम आंदोलनातून मांडण्यात आला. यामध्ये ओबीसी समाजाला आरक्षण तत्काळ देण्यात यावे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुका रद्द करण्यात याव्यात या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. सुमारे पाऊन तास हे आंदोलन झाले. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे, एन.डी.देशमूख, सुनिल देशमुख, दिनेश नरवाडकर, विजय दराडे, संजय कुलकर्णी, रामदास पवार, मोहन कुलकर्णी, अनंता गिरी, संतोष जाधव, मुकीम खिल्लारे, रितेश जैन, सुप्रिया कुलकर्णी, गीता सूर्यवंशी, ऐश्वर्या कांबळे, विजय गायकवाड, गणेश जाधव, संजय जोशी, गणेश देशमुख, संजय शेळके, रोहित जगदाळे, समीर दुधगावकर, मिरज बुचाले, प्रिया पेदापल्ली, सारिका धुमाळ, विजया कातकडे, शंकुतला मठपती, डाँ. पुष्पा मुंडे, प्रिया कुलकर्णी, पूनम शर्मा यांच्यासह जवळपास १०० पदाधिकाऱ्यांचा चक्काजाम आंदोलनात सहभाग होता.
या आंदोलनाला वंजारी सेवा संघ असोसिएशन, राष्ट्रीय नाभिक संघ व ब्राम्हण महासंघाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी नानलपेठ तसेच कोतवाली पोलिस स्टेशन आणि दंगा नियंत्रण पथकाने तगडा बंदोबस्त आंदोलनस्थळी ठेवला होता. चक्काजाम आंदोलनामुळे जिंतूर महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. प्रशासनाकडून आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेण्यात आल्या. पोलिस ठाण्यात सर्व आंदोलकांना हजर करण्यात आले, त्यानंतर काही वेळाने आंदोलकांची सुटका करण्यात आली.