'नटराज' ची उघडली दारं
By Admin | Updated: December 5, 2014 15:17 IST2014-12-05T15:17:16+5:302014-12-05T15:17:16+5:30
तब्बल पाच वर्षानंतर परभणीच्या सांस्कृतिक जगताचा मानबिंदू असणार्या नटराज रंगमंदिराची स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने दारं उघडली.

'नटराज' ची उघडली दारं
>परभणी: तब्बल पाच वर्षानंतर परभणीच्या सांस्कृतिक जगताचा मानबिंदू असणार्या नटराज रंगमंदिराची स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने दारं उघडली. स्थानिक कलावंत आणि महापालिका प्रशासनाने चार तास राबून रंगमंदिराच्या आतील आणि परिसरातील घाण काढली. या अभियानाची गुरूवारी दिवसभर शहरात चर्चा होती. 'नटराज'च्या पूनरुज्जीवनासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल अनेक कलावंतांनी तसेच नागरिकांनी 'लोकमत'चे आभार मानले. / संपूर्ण राज्यभर परभणीच्या सांस्कृतिक चळवळीचा एकेकाळी दबदबा होता. सांस्कृतिक चळवळीच्या अनेक घटनांचा व दिग्गज कलाकारांच्या पदस्पर्शाचा साक्षीदार असलेल्या नटराज रंगमंदिरची गेल्या पाच वर्षांपासून वाताहत झाली होती. महानगरपालिकेने कंत्राटी पद्धतीवर 'नटराज' चालविण्याचा खटाटोप केला. परंतु, त्यामध्ये यश आले नाही. परिणामी 'नटराज'ला कुलूप लागले. सांस्कृतिक चळवळ जीवंत राहिली पाहिजे, या भावनेतून 'लोकमत'ने गेल्या पाच दिवसांपासून 'नटराज'च्या पुरुज्जीवनासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. याला कलावंत व परभणीकर भरभरुन प्रतिसाद देत आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी, मनपा प्रशासन, पदाधिकारी आदींना निवेदन दिल्यानंतर आंदोलनाचाही इशारा कलावंतांनी दिला. तरीही उपयोग झाला नाही. झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागेवर आणण्यासाठी ४ डिसेंबर रोजी 'नटराज' व परिसराची साफसफाई करण्याचा निर्णय कलावंतांनी घेतला. त्यानुसार गुरुवारी सकाळीच ६ वाजेपासूनच नटराज रंगमंदिर परिसरात कलावंत जमू लागले. अध्र्या तासात जवळपास २५ कलावंत आणि ५0 नागरिक जमा झाले आणि 'नटराज'च्या साफसफाईला सुरुवात झाली. 'नटराज'चे कुलूप उघडताच समोरील दृश्य पाहून कलावंत स्तब्ध झाले. याच व्यासपीठाने मान, सन्मान दिला. चांगल्या कलेची दाद देत हजारो टाळ्यांचा वर्षाव झाला. महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रात वेगळा ठसा उमठविणार्या कलाकारांनीही येथे कला सादर केल्या. त्याच व्यासपीठाची दयनीय अवस्था पाहून कलावंतांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर स्वत:हून साफसफाईची सुरुवात करण्यात आली. काही कलावंतांनी रंगमंदिरासमोर पथनाट्य सादर करुन आपला रोष व्यक्त केला. सकाळी ८ वाजेच्या सुमारास उपमहापौर भगवान वाघमारे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी कलाकारांशी संवाद साधला. नटराज पुरुज्जीवन करण्याचे आश्वासन दिले व स्वत:ही वाघमारे स्वच्छता अभियानात उतरले. त्यांच्यासोबत कलावंत प्रा.रविशंकर झिंगरे, किशोर पुराणिक, बालनाथ देशपांडे, मिलिंद साळवी, कुमार पुराणिक, प्रमोद बल्लाळ, मधुकर उमरीकर, सुनील ढवळे, विनोद डावरे, अनुजा डावरे, प्रशांत पिंपरकर, अभय कुलकर्णी, उपेंद्र दुधगावकर, प्रकाश बारबिंड, नागेश कुलकर्णी, त्र्यंबक वडसकर, अरुण हिस्वनकर, संजय पांडे, डिगांबर दिवाण, राजेश शेलार, दिनकर देशपांडे यांनीही सफाई मोहितेत सहभाग घेतला. यावेळी मनपा उपायुक्त रणजीत पाटील, राजेंद्र वडकर, सुशिल नर्सीकर, सय्यद इम्रान, प्रकाश कुलकर्णी, मीर शाकेर अली, मालमत्ता व्यवस्थापक मुकूंद मस्के, कर अधीक्षक श्रीपाद कुलकर्णी, गजानन जाधव, रईस खान, अशोक स्वामी, मेहराज अहेमद, गणेश लहाने, सुनील वसमतकर, गंधम हे ही उपस्थित होते.
दरम्यान, उपायुक्त रणजीत पाटील यांनी या प्रसंगी कलावंतांनी संयम आणि सहकार्याची भूमिका घ्यावी. संघर्ष समिती स्थापन करावी, मनपाचे एक कार्यालय या ठिकाणी सुरु करु, असे आश्वासन दिले. त्यामुळे पाटील यांच्याकडून कलावंतांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण होतात की, फोल ठरतात, याकडे जिल्ह्यातील सर्व कलावंतांचे लक्ष लागले आहे.