ग्रामीण भागात मोहन फड यांचेच वर्चस्व
By Admin | Updated: October 23, 2014 14:21 IST2014-10-23T14:21:55+5:302014-10-23T14:21:55+5:30
विधानसभा/ निवडणुकीत पाथरी तालुक्यामध्ये आपले वर्चस्व कायमठेवण्यात आ. बाबाजानी दुर्राणी यांना यश आले असले तरी ग्रामीण भागात मात्र अपक्ष उमेदवार मोहन फड यांचा वरचष्मा दिसून आला.

ग्रामीण भागात मोहन फड यांचेच वर्चस्व
>विठ्ठल भिसे /पाथरी
विधानसभा/ निवडणुकीत पाथरी तालुक्यामध्ये आपले वर्चस्व कायमठेवण्यात आ. बाबाजानी दुर्राणी यांना यश आले असले तरी ग्रामीण भागात मात्र अपक्ष उमेदवार मोहन फड यांचा वरचष्मा दिसून आला. हा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा गड समजला जात असला तरी मोहन फड यांना मात्र ग्रामीण भागातील जनतेने अपेक्षेपेक्षा जास्त मताधिक्य दिल्याचे दिसून आले.
पाथरी विधानसभा मतदारसंघात पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणी तालुक्यांचा समावेश आहे. पाथरी शहरात १७ हजार ९९0 तर ग्रामीण भागात ५१ हजार ९५६ असे ६९ हजार ४९६ मतदान झाले. या तालुक्यात गेल्या वर्षांपासून प्रमुख सत्तास्थाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. आ. बाबाजानी दुर्राणी गेल्या दोन वर्षांपासून परभणी, हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बाबाजानी यांना उमेदवारी मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून अपक्ष लढविण्याच्या तयारीत असलेले सुरेश वरपूडकर काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले. या तालुक्यामध्ये बाबाजानी दुर्राणी यांना २४ हजार ५३0, अपक्ष उमेदवार मोहन फड १८ हजार ४३८, काँग्रेस उमेदवार सुरेश वरपूडकर यांना १0 हजार ४९९ तर शिवसेनेच्या उमेदवार मीराताई रेंगे यांना ८ हजार २८0 मते मिळाली.
पाथरी शहरात १७ हजार ९९0 मतदानापैकी बाबाजानी दुर्राणी यांना १0 हजार ६६६, मोहन फड यांना १ हजार १२४, सुरेश वरपूडकर यांना ३ हजार ७८७ आणि मीराताई रेंगे यांना १ हजार ३0६ मते मिळाली. शहरामध्ये बाबाजानी यांचा वरचष्मा कायम राहिला. ग्रामीण भागामध्ये झालेल्या ५१ हजार ९५६ मतदानापैकी बाबाजानी दुर्राणी यांना १३ हजार ८६४, मोहन फड यांना १७ हजार ३४४, सुरेश वरपूडकर यांना ६ हजार ७१२ तर मीराताई रेंगे यांना ६ हजार ९७४ मते मिळाली.
बाबाजानी दुर्राणी यांना पाथरी विधानसभा मतदार संघात ४६ हजार ३0८ मते मिळाली तर त्यांना मिळालेले अध्र्यापेक्षा अधिक मते पाथरी तालुक्यातून मिळाली आहेत. मोहन फड यांना ग्रामीण भागात मताधिक्य मिळाले असले तरी शहरात मात्र त्यांचा प्रभाव दिसून आला नाही.
विद्यमान शिवसेनेच्या आ. मीराताई रेंगे यांना आपला गड कायम राखता आला नाही. पाथरी तालुक्यात त्यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत पाथरी मतदार संघात शिवसेनेला २५ हजारांची आघाडी मिळाली होती. पाथरी तालुक्यातही शिवसेना २५0 मतांनी आघाडी राहिली होती. तर सुरेश वरपूडकर यांना ऐनवेळी काँग्रेसचे तिकीट मिळाले. पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागात त्यांना पाहिजे तेवढा प्रभाव पाडता आला नाही. ग्रामीण भागात गावनिहाय मतांच्या टक्केवारीमध्ये मोहन फड पुढे असल्याने या निवडणुकीत त्यांनी तीन वर्षे केलेल्या शेत रस्ते, समाज मंदिरांना निधी, विविध जातींच्या समाजासाठी वेगवेगळा निधी स्वखर्चातून केल्याने त्याचा प्रभाव शेवटपर्यंत या तालुक्यात राहिला असल्याचे आढळून आले आहे. अपेक्षेप्रमाणे मोहन फड यांना मताधिक्य मिळाल्याने त्यांच्या निवडीमध्ये पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागाचा वाटा मोठा असल्याचे दिसून येत आहे.
------------
> या मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर झालेल्या मतदानाची कारणमीमांसा केली जात आहे. मोहन फड यांच्याकडे एकाही बडा नेता नव्हता. निवडणुकीपूर्वी त्यांनी एकदा एका गावाला भेट दिल्यानंतर स्वखर्चातून कामे करण्यास वेळ दिला. निवडणुकीच्या काळात अशा गावांना दुसर्यांदा भेटीही दिल्या नाहीत. तरीही मतदार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचे आढळून आले. ओबीसी समाज, पुरोगामी कुणबी मराठा समाज आणि शेत रस्त्याचा शेतकरी वर्ग व सर्वसामान्य मतदार त्यांच्या पाठीशी असल्याचे यावरून दिसून आले. कार्यकर्त्यांना प्रभाव टाकला आला नाही
> या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची झाली. तालुक्यामध्ये प्रमुख सत्ताकेंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. काँग्रेसचा गटही मोठय़ा प्रमाणावर सक्रिय आहे.
> कार्यकर्त्यांना मतदारांवर प्रभाव टाकता आला नाही. तर शिवसेनेमध्येही अंतर्गत कलह उफाळून आल्याने त्याचा परिणाम मतपेटीवर झाला. या तालुक्यात अनेक वर्षांपासून शिवसेनेचा सातत्याने प्रभाव राहिला आहे. परंतु, या निवडणुकीत शिवसेनेच्या परंपरागत मतदारांनी शिवसेनेकडे पाठ फिरवत अपक्षाची कास धरल्याचे दिसून आले.