परभणीत दोन महिन्यानंतर बाजारपेठ खुली; नागरिकांची तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 17:45 IST2021-06-02T17:43:28+5:302021-06-02T17:45:25+5:30
लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर २ ते ४ जूनपर्यंत बाजारपेठ खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

परभणीत दोन महिन्यानंतर बाजारपेठ खुली; नागरिकांची तोबा गर्दी
परभणी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन महिन्यांपासून बंद असलेली बाजारपेठ २ जून रोजी सुरू करण्यात आली. सकाळपासूनच खरेदीसाठी ग्राहक मोठ्या संख्येने बाजारपेठेमध्ये दाखल झाल्याने एकच गर्दी झाली होती.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण नोंद होत असल्याने प्रशासनाने २४ मार्च रोजी आदेश काढून प्रथमच दिवसाची संचारबंदी लागू केली. त्यानंतर प्रत्येक वेळी या संचारबंदीत वाढ करण्यात आली. तब्बल दोन महिने जिल्ह्यातील बाजारपेठ ठप्प होती. मध्यंतरीच्या काळात आवश्यक सेवेत मोडणारे किरणा आणि फळे, भाजी विक्रीच्या दुकानांना सकाळी ७ ते ११ या वेळेत सवलत दिली होती. ही दुकाने वगळता जिल्ह्यातील बाजारपेठ पूर्णतः ठप्प होती. सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ सुरू होईल, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र ३१ मे रोजी जिल्हा प्रशासनाने केवळ किराणा आणि भाजी विक्रीच्या दुकानांनाच परवानगी दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर २ ते ४ जूनपर्यंत बाजारपेठ खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
प्रशासनाचा निर्णयानुसार बुधवारी सकाळपासूनच बाजारपेठेतील दुकाने सुरू झाली. किराणा, भाजी विक्रीसह रेडिमेड कापड, इलेक्ट्रॉनिक्स, सौंदर्यप्रसाधने, झेरॉक्स सेंटर, कटिंग सलून, पुस्तकांची दुकाने यासह जिल्ह्यातील किरकोळ व्यावसायिकांनीही दुकाने दुकाने सुरू केली. बाजारपेठ सुरू झाल्याने व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. दोन महिन्यांपासून व्यवसाय ठप्प पडल्याने व्यापारी अडचणीत होते. हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी व्यापाऱ्यांनीही उत्साहाने दुकाने सुरू केली.
नागरिकांचीही अत्यावश्यक सेवेतील व इतर सर्व कामे ठप्प होती. त्यामुळे नागरिकही मोठ्या संख्येने बाजारपेठेत खरेदीसाठी दाखल झाले. कापड मार्केट, सराफा मार्केट यासह इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेतही बुधवारी ग्राहकांची गर्दी दिसून आली. शहरातील शिवाजी चौक, कच्छी बाजार, जनता मार्केट, नानलपेठ, गांधी पार्क, क्रांती चौक, गुजरी बाजार, अष्टभुजा देवी मंदिर परिसर, नारायण चाळ, नवा मोंढा, ग्रँड कॉर्नर या परिसरात दुपारपर्यंत नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करून होते. एकंदर बाजारपेठ सुरू झाल्याने व्यापाऱ्यांबरोबरच नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
जागोजागी वाहतूक ठप्प
तब्बल दोन महिन्यानंतर संपूर्ण बाजारपेठ खुली झाल्याने नागरिकांनीही प्रतिसाद देत खरेदीसाठी बाजारपेठ गाठली. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दोन महिन्यानंतर जागोजागी वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे दिसून आले. जनता मार्केट, शिवाजी चौक, नानलपेठ, गांधी पार्क, गव्हाणे चौक आदी परिसरात अनेक वेळा वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना मोठे प्रयत्न करावे लागले. विशेष म्हणजे, संचारबंदी काळात एकेरी वाहतुकीचे नियम गुंडाळून ठेवले होते. आजही एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक झाल्याने दिवसभर शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.