जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:17 IST2021-04-11T04:17:17+5:302021-04-11T04:17:17+5:30
राज्यभरात कोरोनाचा प्रतिबंध वाढत असल्याने शासनाने १ एप्रिलपासून ब्रेक के चेन अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत व्यापारपेठेवर निर्बंध ...

जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद
राज्यभरात कोरोनाचा प्रतिबंध वाढत असल्याने शासनाने १ एप्रिलपासून ब्रेक के चेन अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत व्यापारपेठेवर निर्बंध लावले असून केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. उर्वरित बाजारपेठ बंद आहे. प्रत्येक आठवड्यात वीकेंडच्या दिवशी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. त्यानुसार शनिवारी पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या.
येथील शिवाजी चौक, कछी बाजार, गुजरी बाजार, सराफा मार्केट या परिसरातील किराणा, कापड, इलेक्ट्रॉनिक्स व इतर दुकाने शनिवारी बंद राहिली. त्यामुळे बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसून आला. अत्यावश्यक सेवेतील केवळ औषधी दुकाने शहरात सुरू होती. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी या निर्बंधांना विरोध केला असून, बाजारपेठ सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्यामुळे यासंदर्भात सोमवारी काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.
रस्त्यांवर वाहतूक सुरूच
जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू झाली आहे. असे असतानाही केवळ बाजारपेठच बंद असल्याचे दिसून आले. शहरातील रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच नागरिकांची वर्दळ होती. वाहतूकही मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे संचारबंदीचा कुठलाही परिणाम दिसून आला नाही. केवळ बाजारपेठ बंद राहिली. नागरिकांचे उर्वरित दैनंदिन व्यवहारावर काहीही परिणाम झाला नाही.