सोनपेठ शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:02 IST2021-02-05T06:02:57+5:302021-02-05T06:02:57+5:30
शहरातील मुख्य असलेला पाथरी-परळी व शेळगाव हा रस्ता आगोदरच अरुंद आहे. त्यातही भर चौकात अतिक्रमण करत प्रतिष्ठाने थाटल्याने या ...

सोनपेठ शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात
शहरातील मुख्य असलेला पाथरी-परळी व शेळगाव हा रस्ता आगोदरच अरुंद आहे. त्यातही भर चौकात अतिक्रमण करत प्रतिष्ठाने थाटल्याने या ठिकाणी वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाथरी-परळी हा रस्ता नुकताच राष्ट्रीय महामार्ग घोषित केला असला तरी या रस्त्याच्या कामाची सुरुवात झाली नाही. तो कधी होईल हा फार मोठा प्रश्न असला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होत असून रहदारीला मुख्य अडथळा हे अतिक्रमण ठरत आहे. याकडे सबंधित प्रशासनाने लक्ष ठेवून कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
शिवाजी महाराज चौकात नेहमीच वाहतूक कोंडी
पाथरी-परळी व गंगाखेड रस्त्यावरील रहदारीसाठीचा मुख्य असलेल्या शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करत व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने थाटले आहेत. शिवाय याच चौकात तालुक्यातील मोठी बँक असल्याने येथे कायमच गर्दी असते. आगोदरच अरुंद रस्ता आणि नागरिकांची गर्दी यामुळे या ठिकाणी वाहतुकीची नेहमीच कोंडी होत असते. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
ऊस वाहतुकीला अतिक्रमणांचा फटका
परिसरातील उसाचे क्षेत्र व तालुक्यातील कारखाना असल्याने सोनपेठ शहरातून उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या ऊस वाहतुकीलासुद्धा शहरातील अतिक्रमणामुळे कारखान्याकडे जायला उशीर होत असून परिणामी उशिरा माप होत आहेत. यामुळे उसाच्या वाहतुकीलासुध्दा शहरातील अतिक्रमणाचा फटका बसत आहे.