कमी दाबाने पाणीपुरवठा नागरिक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST2021-03-27T04:17:28+5:302021-03-27T04:17:28+5:30
गंगाखेड : शहरात मागील १५ दिवसांपासून नगरपालिकेच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाकडून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील ५ ...

कमी दाबाने पाणीपुरवठा नागरिक संतप्त
गंगाखेड : शहरात मागील १५ दिवसांपासून नगरपालिकेच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाकडून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील ५ नगरांतील नागरिक संतप्त झाले आहेत.
शहरातील गोदावरी नदीपात्रात नगरपालिकेची विंधन विहीर असून, या विहिरीवर २० एचपीच्या दोन विद्युत मोटारी आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून या मोटारी जळण्याचे प्रमाण नित्याचे झाले आहे. चार दिवसांपूर्वी या दोन विद्युत मोटारींपैकी एक २० एचपीची मोटार जळाल्याने शहरातील सखल भागातच पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत आहे. मात्र इतर भागातील वैष्णव गल्ली, पाठक गल्ली, जामा मशीद परिसर, टोले गल्ली, खडकपुरा यासह आदी भागात आठवड्यातून एकदा होणारा पाणीपुरवठा आता १५ दिवसांवर गेला आहे. विशेष म्हणजे हा पाणीपुरवठा १५ दिवसांनी होऊनही कमी दाबाने होत आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नगरपालिकेचा सार्वजनिक पाणीपुरवठा कोलमडला असल्याने बहुतांश नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.