जिल्ह्यात वाढली उन्हाची तीव्रता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:17 IST2021-02-13T04:17:49+5:302021-02-13T04:17:49+5:30
शहरातील रस्त्यांवर अस्थायी अतिक्रमणे परभणी : शहरात मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अस्थायी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण ...

जिल्ह्यात वाढली उन्हाची तीव्रता
शहरातील रस्त्यांवर अस्थायी अतिक्रमणे
परभणी : शहरात मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अस्थायी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहे. मनपाने बाजारपेठ भागासह मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविल्यास रस्ते वाहतुकीसाठी मोकळे होण्यास मदत होणार आहे. सध्या वसमत रोड ते उघडा महादेव या भागातील अतिक्रमणे हटविली जात आहेत. अशीच मोहीम बाजारपेठ भागातही राबवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
दोन महिन्यांपासून रस्ता वाहतुकीसाठी बंद
परभणी : येथील विद्यापीठ गेट भागातील अक्षदा मंगल कार्यालयासमोरील रस्ता मागील दोन महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या भागात उड्डाण पुलाचे काम केले जात आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना वळसा घालून विद्यापीठात जावे लागत आहे. ही गैरसोय लक्षात घेता पुलाचे काम त्वरित पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.
कालव्यांना पाणी सोडल्याने शेतकऱ्यांत समाधान
परभणी : जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे रबी हंगामातील सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा ही दोन्ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने पिकांना पाणी देणे अत्यावश्यक झाले होते. याच दरम्यान दोन्ही प्रकल्पांच्या कालव्यांना पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला आहे.
बाजारासाठी पर्यायी जागा देण्याची मागणी
परभणी : येथील शनिवार बाजार भागात आठवडी बाजार भरविला जातो. त्यामुळे बाजाराच्या दिवशी येथील वाहतूक ठप्प होत आहे. अरुंद रस्ते आणि त्यात बाजारपेठेत होत असलेल्या गर्दीमुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. प्रत्येक शनिवारी निर्माण होणाऱ्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तातडीने बाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
अवैध वाळू उपशाला लागेना लगाम
परभणी : जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध पोलीस व महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जात असली तरी हा उपसा अद्यापही थांबलेला नाही. गंगाखेड, पूर्णा आणि परभणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने अजूनही सर्व वाळू घाटांचे लिलाव केले नाहीत, त्यामुळे वाळूची चोरी वाढत चालली आहे. वाळू चोरीविरुद्ध कडक कारवाईची मागणी होत आहे.